कल्याण पश्चिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात, अनधिकृत थांब्यावर रिक्षा चालकांमध्ये पुन्हा एकदा अरेरावी पाहायला मिळाली आहे. अनधिकृत थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षा हटवण्यावरून निर्माण झालेला वाद थेट तुफान राड्यापर्यंत पोहोचलेला आहे. रहदारीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर दोन रिक्षा चालकांमध्ये झालेल्या मारामारीमुळे काही काळ स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर घडल्यानंतर भांडण करणाऱ्या रिक्षा चालकांची पोलिसांकडून समजूत काढण्यात आली. अनेक रिक्षा चालक अधिकृत रिक्षा थांब्याऐवजी थेट मुख्य रस्त्यावर, चौकात किंवा स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरच रिक्षा उभ्या करत असल्याचे पाहायला मिळते.
advertisement
यामुळे परिसरामध्ये रिक्षा चालकांची गर्दी, रस्त्यावर चालणाऱ्यांची गर्दी, खासगी वाहनधारकांची गर्दी आणि फेरीवाल्यांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका होण्याची मोठी गैरसोय होत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अनधिकृतपणे उभ्या असलेल्या रिक्षा हटवण्याची कारवाई सुरू असताना काही रिक्षा चालकांनी याला तीव्र विरोध केला होता. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही क्षणातच हा वाद हाताबाहेर गेला आणि दोन रिक्षा ड्रायव्हरमध्ये जोरदार भांडण झाले. एकमेकांना शिवीगाळ, ढकलाढकली आणि मारहाणीपर्यंत हा प्रकार पोहोचला. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना रहदारी सुरू असलेल्या मुख्य रस्त्यावर घडल्याने काही काळ पूर्णपणे वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करून संपूर्ण प्रकार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी दोन्हीही रिक्षा चालकांवर कारवाई करण्याऐवजी मध्यस्थी करत समज देण्याचा प्रयत्न केला. सध्या हा कल्याण स्थानकावरील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी घेतली असून व्हायरल व्हिडिओमधील ड्रायव्हर्सवर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. प्रत्यक्षात दोषींवर कारवाई होते की केवळ आश्वासनांपुरतेच हे प्रकरण मर्यादित राहते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस आणि कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
