नेमके काय घडले होते?
मिळालेल्या माहितीनुसार,9 मे 2025 रोजी उल्हासनगर-3 येथील परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. मालमत्तेच्या वादातून आनंद सूर्यवंशी याने पत्नी सुरेखा सूर्यवंशी (वय 47) हिच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
गुन्हा घडल्यानंतर आरोपी आनंद सूर्यवंशी हा फरार झाला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने मोबाईल फोनचा वापर पूर्णपणे बंद ठेवला होता. तसेच तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहत आपली ओळख लपवत होता. त्यामुळे पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेणे मोठे आव्हान ठरले होते.
पोलिसांना फसवण्याचा डाव अखेर फसला
दरम्यान ठाणे शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळोदे यांना आरोपी आनंद सूर्यवंशी नाशिकरोड परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
6 जानेवारी रोजी पोलिस पथकाने नाशिक येथे सापळा रचत आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 14 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सध्या पोलिस आरोपीकडून या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
