कल्याणचा महत्त्वाचा पूल 20 दिवस बंद
मिळालेल्या माहितीनुसार हा पूल शुक्रवार 20 डिसेंबरच्या रात्रीपासून पुढील 20 दिवसांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून 10 जानेवारी 2026 पर्यंत बंद असणार आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
शाळांना नाताळच्या सुट्ट्या असल्याने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर कमी परिणाम व्हावा या उद्देशाने दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
जाणून घ्या पर्यायी मार्ग
या दिवसांत कल्याण पूर्वेकडून स्व.आनंद दिघे उड्डाणपुलावरून कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सम्राट चौक येथून वालधुनी पुलाकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संबंधित वाहनांना सम्राट चौकात उजवीकडे वळून शांतीनगर-उल्हासनगर मार्गे इच्छित स्थळी जाण्याची सूचना देण्यात आली आहे.
तसेच उल्हासनगरकडून वालधुनी पुलाच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेकडे येणाऱ्या वाहनांना सम्राट चौकात प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून ही वाहने डावीकडे वळवून स्व.आनंद दिघे उड्डाणपुलावरून पुढे पाठवली जाणार आहेत. दरम्यान कल्याण पश्चिमेकडून वालधुनी पुलावरून उल्हासनगर किंवा स्व.आनंद दिघे पुलामार्गे कल्याण पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना सुभाष चौकात थांबवण्यात येणार असून ती वाहने सरळ पुढे कर्णिक रोडने जात प्रेम ऑटो परिसरात उजवे वळण घेऊन शहाड पुलामार्गे मार्गस्थ केली जाणार आहेत. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
