थांब्यांसाठी सातत्याने मागणी सुरु
गेल्या काही वर्षांपासून अनेक स्थानिक नागरिक शिवाय प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भागातील रेल्वे स्थानकांवर गाड्यांचे थांबे मिळावेत यासाठी वारंवार प्रयत्न सुरू होते. यासाठी मध्य रेल्वे प्रशासन,रेल्वे मंडळ तसेच रेल्वे मंत्र्यांकडे वारंवार निवेदनं देखील दिली गेली.परंतू, थांबे मंजूर करण्याचा अंतिम अधिकार रेल्वे मंडळाकडे असल्यामुळे हा प्रश्न लांबणीवर पडत होता.स्थानिक लोकप्रतिनिधींसह खासदारांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, गाडी क्रमांक ११००३/११००४ 'दादर–सावंतवाडी–दादर तुतारी एक्स्प्रेसला' रोहा स्थानकावर थांबा मिळाला आहे. तसेच गाडी क्रमांक १०१०५/१०१०६ 'दिवा–सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेसला' पेण स्थानकावर थांबा देण्यात आलेला आहे. ही सुविधा प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
advertisement
पाच वर्षांनंतर थांबे पुन्हा बहाल
अखिल कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना काही मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.त्यात त्यांनी सांगितले की,काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेने 'झीरो बेस्ड' वेळापत्रक लागू करताना अनेक गाड्यांचे थांबे रद्द केले होते.पण त्यावेळी,प्रवासी सुविधा वाढवण्याऐवजी कमी करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. आता तब्बल पाच वर्षांनंतर हे थांबे पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहेत.
महापदी म्हणाले,''जर हे थांबे पुन्हा सुरू करायचे होते,तर ते पाच वर्षांपूर्वीच का काढून टाकले गेले होते? 'झीरो बेस्ड'वेळापत्रकाचा नेमका कोणाला फायदा झाला? तो लागू करताना झालेल्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार? पाच वर्षांत प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन उत्तरदायी नाही का? की निवडणुकीच्या तोंडावर केवळ राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे?''
राज्यात कोणत्या स्थानकांवर किती गाड्या थांबणार?
रेल्वे मंत्रालयाच्या नव्या यादीत २३ स्थानकांवर थांबे मंजूर झाले असून ज्यात इगतपुरी स्थानकावर सर्वाधिक म्हणजेच ८ गाड्यांचा थांबा मंजूर झाला आहे. देवळाली येथे ४ गाड्यांचे थांबे मिळाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील भादली येथे २, सोलापूरमधील मोहोळ येथे २, भिवंडी रोड येथे २ तर, पुण्यातील वलीवडे येथे २, अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद येथे २,सोलापूरमधील सारोळा येथे २, अहिल्यानगरमधील राहुरी येथे २ आणि रांजणगाव रोड येथे २, पढेगाव रोड येथे २, काष्टी येथे २, चितळी येथे २, बेलवंडी येथे २, अकोलनेर येथे २, वांबोरी येथे २, जंबाडा येथे २, हिरदागड येथे शिवाय मरतूर येथे २ गाड्यांचे थांबे मंजूर करण्यात आले आहेत.
कोकणवासीयांसाठी विशेष महत्त्व
कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रोहा आणि पेण थांबे हा मोठा दिलासा ठरणार आहे. विशेषत म्हणजे दादर,दिवा,ठाणे,पनवेल आणि त्यानंतरच्या कोकण मार्गावरील प्रवाशांना याचा थेट फायदा होईल. अनेक वर्षांपासून या दोन्ही स्थानकांवर थांबे मिळावेत यासाठी प्रवासी संघटनांनी लढा दिला होता. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी रोहा हा महत्त्वाचा जंक्शन असून येथे थांबा मिळाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होईल.