हिंदू कॉलनीसारख्या सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध भागात असलेल्या या कॅफेने अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे येथे नियमित येत असत अशी स्थानिकांमध्ये आजही चर्चा आहे. त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी येथे तयार करण्यात आलेली बिर्याणी ही या कॅफेच्या इतिहासातील अभिमानाची गोष्ट मानली जाते.
advertisement
खाद्यपदार्थांच्या बाबतीत येथे मिळणारा खिमा पाव हा सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे. त्याचबरोबर खिमा फ्राय, खिमा घोटाळा, भेजा फ्राय, चिकन शमी कबाब, आलू गोश्त आणि डाळ गोश्त हे पदार्थही रसिकांच्या पसंतीस उतरतात. शुक्रवारी मिळणारी खास मटण बिर्याणी तर ग्राहक खास त्यासाठीच येथे गर्दी करतात. येथील पदार्थांच्या किंमती 50 रुपयांपासून सुरू होतात.
गोड पदार्थांमध्ये इराणमधून खास मागवले जाणारे गज हे कॅफेचे आकर्षण आहे. हे पारंपरिक इराणी गोड पदार्थ पिस्ता, बदाम, कॅमल मिल्क, साखर आणि नैसर्गिक वनस्पती गोंद (ट्रॅगाकँथ) यापासून तयार केले जातात. त्यासोबतच बकलावा, सोहन हलवा, केसर आणि खजूर यामुळे कॅफेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पेयांमध्ये येथे मिळणारा आईस्क्रीम सोडा हा विशेष लोकप्रिय आहे. याशिवाय ब्लूबेरी, रास्पबेरी यांसारखे फ्लेवर्ड सोडा ड्रिंक्सही येथे मिळतात आणि तरुणांमध्ये विशेष पसंतीस उतरतात.
जुन्या पद्धतीचे लाकडी टेबल-खुर्च्या, भिंतींवरील साधी सजावट आणि वर्षानुवर्षे जपलेली चव यामुळे येथे येणाऱ्यांना जुन्या मुंबईचा अनुभव मिळतो. कॅफे कॉलनी रेस्टॉरंट हे केवळ एक खाद्यपदार्थांचे ठिकाण नसून मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा जपलेला ठेवा आहे.





