जयपूर : एका वयानंतर स्मरणशक्ती कमकुवत होणं सामान्य आहे. मात्र आजकाल अगदी तरुणपणातच आपण गोष्टी विसरायला लागतो. ज्याचं मुख्य कारण आहे तणावपूर्ण आयुष्य. शिवाय असंतुलीत आहारामुळेही असं होऊ शकतं. म्हणूनच आहारात काही बदल करून आपण आपली मेमरी एकदम स्ट्राँग करू शकतो.
सफरचंद : दररोज जेवणाच्या 15 मिनिटांआधी 1 सफरचंद चावून-चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे डोकेदुखी दूर होते आणि स्मरणशक्तीही तल्लख होण्यास मदत मिळते. शिवाय सफरचंद त्वचेसाठीसुद्धा उत्तम मानलं जातं.
advertisement
बदाम : बादाम खाल्ल्यानं स्मरणशक्ती चांगली होते, हे आपल्याला माहितच असेल. सकाळच्या नाश्त्यात भिजवून सोललेले 5 ग्रॅम बदाम खाणं उत्तम. दुधात खडीसाखर, बडीशेप आणि भिजवलेले बदाम बारीक करून प्यायल्यास स्मरणशक्ती आणि डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते, असं म्हणतात.
मोड आलेल्या डाळी : आपण मोड आलेल्या डाळींचं सलाड बनवून खाऊ शकता. त्यात काकडी, कांदा, टोमॅटो, शिजवलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ, मसाला, लिंबाचा रस घालू शकता.
आवळा : व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असलेला आवळा आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते.
या पदार्थांसह काळीमिरी आणि अक्रोड खाणंही स्मरणशक्तीसाठी उत्तम मानलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहारासोबतच आपल्या मानसिक आरोग्यावरही विशेष लक्ष द्यावं. जास्त ताण घेऊ नये, मन शांत राहायला हवं. शिवाय नियमितपणे व्यायाम केल्यानं मन प्रसन्न राहू शकतं.