जमशेदपूर : आजकालच्या धावपळीच्या जीवनात शरिराचे प्रचंड हाल होतात. आपण पोटभर जेवतो, पण त्यात पौष्टिक पदार्थ फार कमी असतात. शिवाय वेळच्या वेळी जेवताच येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा पोट साफ होत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. शिवाय पोट साफ न झाल्यानं संपूर्ण दिवस बिघडतो. मग यावर उपाय काय, जाणून घेऊया डायटिशियन सुष्मिता सिंह यांच्याकडून.
advertisement
आहारातून पुरेसं फायबर पोटात न गेल्यास शरिरात मळ तयार होतो, जो बाहेर निघणं कठीण होतं. पेय पदार्थ पुरेशा प्रमाणात पोटात न गेल्यानं मळ सुकतो आणि म्हणूनच तो सहजासहजी बाहेर येत नाही. शारीरिक हालचाल न झाल्यानंदेखील बद्धकोष्ठता होऊ शकते. खाण्यापिण्यात बदल झाल्यास अन्न पचत नाही.
हेही वाचा : उपवासाला खिचडी आणि फळं खाऊन कंटाळलात? मग हलवा खा! रेसिपी सोपी
तसंच इर्रिटेबल बॉवेल सिंड्रोम, हायपोथायरॉइडिज्म, डायबिटीज, इत्यादी आजारांमध्येही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. नवी औषधं, पेनकिलर घेतल्यामुळेसुद्धा हा त्रास वाढतो. तसंच मानसिक ताण आल्यामुळेदेखील पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि सहन न होणारी बद्धकोष्ठता होऊ शकते. त्याचबरोबर वाढतं वय, गर्भावस्था आणि आतड्या कमजोर असल्यामुळेही अन्नपचनासंबंधित त्रास होतो.
उपाय काय करावा?
डायटिशियन सुष्मिता सिंह सांगतात की, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावं. आहारात ताज्या फळांचा समावेश करावा आणि घरात बनवलेलंच दही खावं. दररोज कमीत कमी 60 पावलं चालावं. शिवाय योगासनं आवर्जून करावी. ज्यामुळे शरीर ऍक्टिव्ह राहतं आणि पोटही वेळच्या वेळी साफ होतं.