पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेताना कोणत्या चुका टाळाव्यात?
याबाबत माहिती देताना सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, पावसाळा म्हटलं की, कपडे वाळत नाहीत आणि त्यामुळे मग त्वचेचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. आपण पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेताना अशा काही चुका करतो, ज्याकडे आपले लक्ष राहत नाही. या छोट्या छोट्या चुका आपल्याला महाग पडू शकतात. त्या कोणत्या? तर सर्वात पहिले म्हणजे आपण अनेकवेळा ओल्या कापडाने चेहरा पुसतो. त्यामुळे चेहरा लालसर होऊन त्यावर पुरळ येतात. त्यावर लक्ष दिले नाही तर ते वाढत जाते, असे त्यांनी सांगितले.
advertisement
ओलसर मेकअप ब्रश वापरता का?
पुढे त्या सांगतात की, पावसाळ्यात ठेवलेल्या अनेक वस्तूंवर बुरशी लागते. त्यातीलच एक म्हणजे मेकअप ब्रश. आपण एखाद्या वेळी मेकअप करतो आणि ब्रश तसेच ठेवून देतो. ठेवलेले असल्याने त्या ब्रशला बुरशी लागते. आपले लक्ष नसल्यास आपण ते ब्रश तसेच पुन्हा मेकअप करण्यासाठी वापरतो. त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणे किंवा फंगल इन्फेक्शन होणे या सारख्या समस्या होऊ शकतात. त्याचबरोबर चेहऱ्याला खाज सुटणे हे देखील त्यात समाविष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.
सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात वापरण्यात येणारे सर्व कापड, ब्रश आणि इतर काही गोष्टी स्वच्छ धुवून आणि वाळवूनच वापराव्यात. त्यामुळे त्वचेचे आजार होणार नाहीत. चेहरा क्लीन राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर त्वचा रोगांची काही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.