कांजीवरम साडी ही भारतातील सर्वात श्रीमंत, पारंपरिक आणि प्रतिष्ठित रेशमी साड्यांपैकी एक मानली जाते. तामिळनाडूतील कांचीपूरम या ऐतिहासिक शहरात हातमागावर विणल्या जाणाऱ्या या साड्या शुद्ध रेशीम, जाड पोत, उठावदार रंग आणि सोन्या-चांदीच्या जरीच्या कामासाठी ओळखल्या जातात. टिकाऊपणा, राजेशाही लुक आणि पिढ्यान्पिढ्या वापरता येईल असा दर्जा असल्यामुळे महिलांमध्ये या साडीबद्दल विशेष आकर्षण आहे.
advertisement
कांजीवरम आणि कांचीपूरम साडी एकच आहे का?
होय, कांजीवरम साडी आणि कांचीपूरम साडी या मूलत: एकाच प्रकारच्या साड्या आहेत. “कांजीवरम” हे कांचीपूरम या शहराचे इंग्रजी/प्रचलित नाव आहे. त्यामुळे दोन्ही नावांनी ओळखल्या जाणाऱ्या साड्या प्रत्यक्षात कांचीपूरममध्ये तयार होणाऱ्या पारंपरिक रेशमी साड्याच आहेत. फक्त नावात फरक आहे. मात्र दर्जा, विणकाम आणि परंपरा मात्र तीच आहे.
शुद्ध कांजीवरम रेशमी साडी कशी ओळखाल?
शुद्ध कांजीवरम साडी ओळखण्यासाठी सर्वात आधी रेशीम कापडाचा दर्जा तपासा. ही साडी हातात घेतल्यावर मऊ, गुळगुळीत आणि थोडी जड वाटते. हातमागावर विणल्यामुळे कापडावर हलकीशी असमानता दिसू शकते, जी खऱ्या साडीची ओळख आहे.
कांजीवरम साडीचे बॉर्डर आणि पदर नेहमीच वेगळ्या रंगात आणि जाड विण असलेले असतात. डिझाइन छापलेली नसून विणलेली असते. रंग गडद, उठावदार आणि एकसारखा पसरलेला असतो.
जरी खरी की नकली कशी ओळखावी?
खऱ्या कांजीवरम साडीत वापरली जाणारी जर सोन्या किंवा चांदीपासून बनलेली असते. ती चमकदार असते आणि सहज निघत नाही. नखाने हलके खरवडले तरी जर निघत नसेल, तर ती अस्सल असण्याची शक्यता जास्त असते. नकली साड्यांमध्ये जर सहज खराब होते.
रेशीम ओळखण्याची पारंपरिक 'बर्न टेस्ट'
रेशीम खरी आहे का हे पाहण्यासाठी कापडाचा छोटासा धागा जाळला जातो. खरे रेशीम हळूहळू जळते, जळलेल्या केसांसारखा वास येतो आणि बारीक राख उरते. सिंथेटिक धागा मात्र वितळतो आणि रासायनिक वास येतो.
वजन आणि लेबलही महत्त्वाचे
शुद्ध कांजीवरम साडी साधारणपणे 500 ते 800 ग्रॅम वजनाची असते. फार हलकी साडी असल्यास ती अर्ध-रेशीम किंवा नकली असू शकते. तसेच खरी साडी बहुतेक वेळा 'Pure Silk' किंवा 'Kanchipuram Silk' असे लेबल असलेली असते.
कांजीवरम साड्यांचे लोकप्रिय प्रकार
- पारंपरिक कांचीपूरम सिल्क साडी
- सोनेरी बॉर्डर असलेली साधी कांचीपूरम साडी
- कॉन्टेम्पररी (आधुनिक डिझाइन) कांजीवरम साडी
- आणि फुलांच्या नक्षीची फ्लोरल विण असलेली कांजीवरम साडी
कांजीवरम साडी कोणत्या प्रसंगी परिधान करावी?
कांजीवरम साडी ही तिच्या राजेशाही लुक आणि पारंपरिक सौंदर्यामुळे विशेष आणि महत्त्वाच्या प्रसंगांसाठी सर्वाधिक योग्य मानली जाते. लग्नसमारंभात वधू किंवा नातेवाईकांसाठी कांजीवरम साडी ही पहिली पसंती असते. कारण ती शुभ, समृद्धी आणि परंपरेचे प्रतीक आहे. याशिवाय गृहप्रवेश, सण-उत्सव जसे की, दिवाळी, गुढीपाडवा, नवरात्र, धार्मिक पूजा, सत्यनारायण पूजा, तसेच नामकरण किंवा मुंजीसारख्या पारंपरिक विधींमध्ये ही साडी अतिशय शोभून दिसते. शासकीय कार्यक्रम, पुरस्कार समारंभ, मोठे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा औपचारिक सोहळ्यांमध्येही कांजीवरम साडी गंभीर, सुसंस्कृत आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व अधोरेखित करते. टिकाऊ आणि कालातीत डिझाइनमुळे कांजीवरम साडी ही सर्वांना फार आवडते.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
