भाज्यांचं स्वतंत्र राज्य असेल तर बटाटा हा या राज्याचा अनभिषिक्त राजा आहे हे नक्की. कुठल्याही घरात कधीही गेलं तरी तिथल्या स्वयंपाकघरात नेहमी आणून ठेवल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये बटाटा असतोच असतो. मराठी लग्नसोहळ्यात जेवणाची पंगत असेल तर बटाट्याची भाजी त्या जेवणात असणं जणू अनिवार्य असतं. घाईच्या वेळी कुणी अचानक जेवायला आलं तर पटकन करून वाढता येते अशी गोष्ट म्हणजे बटाटा. पण बटाटा हा भाज्यांचा राजा असेल तर मग या राजाची राणी कोण?
advertisement
बॉडी बनवण्याच्या नादात करु नका या चुका, जाणून घ्या जीम करण्याचं योग्य वय काय?
मिरची ही भाज्यांची राणी मानली जाते. भारतीय पद्धतीचा स्वयंपाक, मग तो कुठल्याही राज्यातला असू दे, मिरचीच्या वापराशिवाय अपूर्ण आहे. काही अपवादात्मक पदार्थ आणि पक्वान्न वगळता इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपण भारतीय व्यक्ती मिरचीचा नियमित वापर करतो. कुठल्याही भाजीची फोडणी हिरव्या मिरचीशिवाय पूर्ण होत नाही. मिरचीचं लोणचं किंवा खारातली मिरची हे आवडतं तोंडीलावणं म्हणून भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने करून ते पानात वाढलं जातं. त्यामुळे भाज्यांच्या राणीचा मान द्यायचा असेल तर तो मिरचीलाच द्यावा लागेल.
राणीपदासाठी मिरचीबरोबर स्पर्धा करू शकेल अशी आणखी एक भाजी म्हणजे भेंडी. भेंडीची भाजी सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. भेंडी आवडत नाही अशी माणसं फारच कमी असतात. भेंडीच्या काचऱ्या, भरली भेंडी या गोष्टी नियमितपणे भारतीय घरांमध्ये केल्या जातात. ‘भिंडी फ्राय’ म्हणून हॅाटेलांच्या मेनूकार्डमध्येही भेंडी मिरवताना दिसते. शिवाय भेंडीचा कुठलाही विशिष्ट सीझन नाही. ती वर्षभर मिळते आणि आवडीने खाल्लीही जाते. त्यामुळे अनेक जण भेंडीलाही भाज्यांची राणी मानतात.
