महाराष्ट्रात नवीन लग्न ठरलेल्या वधूवरांचे केळवण करण्याची पद्धत आहे. मराठी कुटुंबात केळवणाची प्रथा अगदी आनंदाने साजरी केली जाते. हा विधी लग्नाआधी केला जातो. केळवण म्हणजे काय तर नुकतंच लग्न ठरलेल्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं जातं. सजावट केली जाते. पाट आणि ताटाभओवती रांगोळी काढली जाते. केळीच्या पानावर पंचपक्वान दिलं जातं. नंतर हळदकुंकू लावून ओटी भरून गिफ्ट दिलं जातं. सामान्यपणे याला केळवण म्हणतात. पण केळवण म्हणजे फक्त जेवण नाही. खरंतर केळवणाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. केळवण करण्यामागे एक खास अर्थ आहे. या परंपरेमागे एक खास किस्सा आहे.
advertisement
Suraj Chavan Wife : बिग बॉसचा विनर संजनाच्या प्रेमात सायको, कोण आहे सूरज चव्हाणची होणारी बायको?
केळवणासाठी गडगनेर असा दुसरा शब्दही आहे. कानडीमध्ये गडि(ड)गे म्हणजे घागर, आणि नीर म्हणजे पाणी. यावरून मराठीत आलेला शब्द गडगनेर. 1832 साली प्रसिद्ध झालेल्या मोल्सवर्थ-कॅन्डी कोशात हा शब्द आहे. त्याअर्थी ही प्रथा फार जुनी असावी. याला मराठवाड्यात वलवत असंही म्हणतात.
केळवणाच्या प्रथेबाबत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी
केळवणाच्या प्रथेचं मूळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सापडतं. या केळवणाच्या प्रथेबाबत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. ना तरी केळवली नोवरी | कां सन्यासी जियापरी | तैसा न मरतां जो करी | मृत्यूसूचना || ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीचा अर्थ असा की, जशी केळवणानंतर वधू आपलं जुनं आयुष्य मागे टाकून सासरी नवं जीवन स्वीकारते, तशीच संन्यासी व्यक्तीही संसाराचा त्याग करून आत्मज्ञानाच्या मार्गावर प्रवास सुरू करतो. याच अर्थाने, जो व्यक्ती जीवनात असतानाच मोह, अहंकार, देहबुद्धी यांचा त्याग करतो, तो जणू मृत्यूच्या आधीच आत्ममुक्त होतो. केळवण फक्त जेवणाचं आमंत्रण नाही, तर नव्या आयुष्याला आनंदाने स्वीकारण्याचा एक भावनिक सोहळा आहे असा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीचा आहे.
केळवणाची परंपरा कशी सुरू झाली?
पूर्वीच्या काळी फक्त मुलीचं केळवण केलं जायचं. याचं कारण म्हणजे मुलगी एकदा का सासरी गेली की तिचा माहेरच्या नातेवाईकांशी संबंध फार कमी व्हायचा. तेव्हा आतासारखी दळणवळणाची साधनंही नव्हती. म्हणूनच सासरी गेलेली लेक सतत माहेरी येण्यासारखी परिस्थिती तेव्हा नव्हती. याचं लेकीचं कोडकौतुक करण्यासाठी माहेरचे नातेवाईक तिचं केळवण करायचे. या केळवणाच्या निमित्ताने सासरी जाणाऱ्या मुलीला माहेरची भेट म्हणून साडी देऊन तिचा सन्मान केला जायचा. केळीच्या पानाभोवती रांगोळी काढली जायची. मुलीला हळद कुंकू लावून तिच्या आवडीचा स्वयंपाक केला जायचा.
केळवणाचं बदलतं रूप
आता अनेकदा लग्नाआधी नवरा, नवरी दोघं काही ठिकाणी त्यांच्या आईवडिलांना सुद्धा आग्रहानं बोलावलं जातं. यानिमित्ताने सर्वजण एकत्र येतात गप्पा गोष्टी होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लग्नाच्या गडबडीतून लग्न घरातील लोकांना थोडा आराम मिळतो. लग्नानंतर वधू किंवा वराचं वैवाहिक आयुष्य सुरु होणार असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याची ही एक प्रथा आहे. केळवणाच्या निमित्ताने परिवार, नातेवाईक, आणि शेजारी सगळे एकत्र येतात. त्यामुळे सामाजिक जिव्हाळा आणि आपुलकी वाढते. हा या प्रथेचा खरा उद्देश आहे.
आजही विविध भागात ही परंपरा सुरू आहे. नव्या पिढीत तिचं स्वरूप बदललं आहे. काही जण तर पार्टीसारखे साजरे करतात. अनेकजण तर नॉन व्हेजचा ही बेत आखतात. आर्थिक सुबत्ता आल्यामुळे या प्रथेचे स्वरूप बदलत आहे. तसेच हॉटेलमध्येही निमंत्रण देऊन केळवण साजरी करतात.
केळवण घालण्याची वेगवेगळी कारणे
केळवण ही परंपरा रूढ होण्यासाठी वेगवेगळी कारणं असावीत. त्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न म्हणजे उत्सव आणि हा उत्सव आणि सर्वांनी मिळून साजरा करणं. त्यासाठी सर्व नातेवाईकांना सहभागी करून घेणं. दुसरं एक कारण म्हणजे ज्या घरी लग्न असतं. त्या घरची मंडळी लग्न समारंभाच्या तयारीसाठी व्यस्त असतात, त्यांना मदत आणि सहकार्य मिळावं, स्वयंपाक करण्याचा वेळ वाचावा यासाठीही जेवणासाठी निमंत्रित करणं हा एक भाग आहे.
