या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली लेखणी अजमावण्याची आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यात विजेत्या विद्यार्थ्याला बक्षिसासह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट ठरलेले पत्र भारताचे अधिकृत नामांकन म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियनकडून निवड झालेल्या पत्रांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके तसेच प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. सुवर्ण पदक विजेत्यास युनिव्हर्सल पोस्टल युनियनचे मुख्यालय असलेल्या बर्न (स्वित्झर्लंड) येथे भेट देण्याची संधी किंवा यूपीयूने ठरविल्याप्रमाणे समतुल्य बक्षीस देण्यात येणार आहे.
advertisement
भाषेसंदर्भातील अटी काय?
स्पर्धेसाठी पत्र मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा आठव्या परिशिष्टामध्ये नमूद भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिता येणार आहे.
राष्ट्रीय पातळीवरील बक्षिसाचे स्वरूप कसे?
प्रथम बक्षीस - 50 हजार, द्वितीय बक्षीस - 25 हजार, तृतीय बक्षीस - 10 हजार याप्रमाणे देण्यात येणार आहे.
पत्रलेखनाचा विषय काय?
यावर्षीच्या स्पर्धेसाठी 'सध्याच्या डिजिटल जगात मानवी संबंध का महत्त्वाचे आहेत, याबाबत मित्राला लिहिलेले पत्र' हा विषय निवडण्यात आला आहे.
अर्जाची अंतिम तारीख काय?
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थी अथवा शाळांनी 20 फेब्रुवारीपर्यंत डाक अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधून दोन प्रतीमध्ये अर्ज करावा. ही स्पर्धा इच्छुक शाळांमध्ये 7 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. तसेच या युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व शाळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.
स्पर्धेत कोणाला भाग घेता येणार?
या स्पर्धेत 9 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे. अर्जासोबत तीन पासपोर्ट साइज छायाचित्रे, वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा तत्सम कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत जोडाव्या लागणार आहे.






