आगामी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने विशेष रणनीती आखल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाच्यावतीने महापालिका क्षेत्रात उत्तर भारतीय संमेलनांचे आयोजन करण्यात येत असून, याच माध्यमातून पक्षाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबईत मराठीचा मुद्दा तापत असताना दुसरीकडे आता भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
उत्तर भारतीय महापौर बसवू...
मीरा भाईंदर येथे आयोजित उत्तर भारतीय संमेलनात भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उपस्थित जनतेला आवाहन केले. कृपाशंकर सिंह यांनी बोलतान “यावेळी उत्तर भारतीयांचा महापौर बसवूया,” असा नारा दिला. आपल्या भाषणात कृपाशंकर सिंह यांनी सांगितलं की, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर ही सलग नववी सार्वजनिक निवडणूक आहे. महापालिका निवडणुका लवकर व्हाव्यात, अशी जनतेची इच्छा होती आणि आता ती पूर्ण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. मीरा भाईंदर महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता येईल, असा ठाम विश्वास कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केला. “आम्ही इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणू की त्यातून उत्तर भारतीय समाजाचा महापौर बसवता येईल,” असा दावाही त्यांनी केला.
फडणवीसांचा विकासाचा बुलडोजर
यावेळी बोलताना कृपाशंकर सिंह यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. “नकली शिवसेना गेली असून खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. हिंदुत्व आणि विकास हेच आमचे मुख्य मुद्दे आहेत,” असं सांगत त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत, “उत्तर प्रदेशात जसा बाबा का बुलडोजर चालतो, तसाच विकासाचा बुलडोजर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे,” अशी उपमा त्यांनी दिली.
“जो कुणी समोर येईल, त्याला उद्ध्वस्त करून भाजपाच्या नेतृत्वाखाली २९ महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल,” असा आक्रमक दावा करत कृपाशंकर सिंह यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं.
