२०१७ च्या निवडणुकीप्रमाणे यावेळी शहरातील सर्व २२७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मतमोजणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
कशी होणार मतमोजणी?
शहरात एकूण २३ मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक केंद्रावर साधारण दहा प्रभागांची जबाबदारी एका मतमोजणी अधिकाऱ्याकडे असणार असली, तरी एका वेळी केवळ दोनच प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचेच मतमोजणीचे काम सुरू राहणार आहे.
advertisement
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही पद्धत स्वीकारल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ कमी प्रभागांवर केंद्रित करता येणार आहे. मतमोजणी शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडणे शक्य होणार आहे. मात्र, या टप्प्याटप्प्याच्या प्रक्रियेमुळे सर्व प्रभागांचे कल एकाच वेळी स्पष्ट होणार नाहीत. काही प्रभागांचे निकाल सकाळीच जाहीर होतील, तर काही प्रभागांचे निकाल दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
अंतिम निकालाला संध्याकाळ होणार?
या निर्णयामुळे यंदा मुंबई महापालिकेच्या निकालांसाठी अधिक वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २२७ वॉर्डांची मतमोजणी एकूण पाच टप्प्यांत पार पडणार असून, प्रत्येक टप्प्यात साधारण ४६ वॉर्डांची मतमोजणी होईल. त्यामुळे निकाल जाहीर होण्याच्या वेळापत्रकाबाबत राजकीय पक्षांसह नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
