पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी लोकल 18 ला दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी धरणाचे 18 दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र, पावसाच्या पुनरागमनामुळे धरणातून विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी (11 सप्टेंबर) धरण परिसरात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरण 99 टक्क्यांपर्यंत भरलं आहे. वाढत्या पाणी साठ्यामुळे 12 सप्टेंबर रोजी यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा मुख्य दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
advertisement
Weather Alert: ताशी 40 किमीने वारे वाहणार, मराठवाड्यात मुसळधार पाऊस होणार, या जिल्ह्यांना हायअलर्ट
जायकवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. पावसाचा जोर कमी-जास्त झाल्यानंतर विसर्ग नियंत्रित केला जातो. सध्या धरणाचे 12 दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे. परिस्थितीनुसार विसर्गाचे प्रमाण वाढवलं किंवा कमी केलं जाणार आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पहिल्यांदा 31 जुलै रोजी धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा 21 ऑगस्टला विसर्ग करण्यात आला. दोन्ही वेळी एकत्रित 40 टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडलं गेलं. काल धरणात पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने तिसऱ्यांदा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.