सातारा: साताऱ्यात सुरू असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाने केवळ साहित्यिक नव्हे, तर सामाजिक आणि वैचारिक चर्चांनाही नवे वळण दिले. या मंचावर बोलताना ज्येष्ठ साहित्यिक आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी परखड आणि सूचक विधानांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. साहित्य संमेलन हे केवळ औपचारिक कार्यक्रम नसून समाजाच्या आचार-विचारांना दिशा देणारे व्यासपीठ असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
advertisement
विश्वास पाटील यांनी सांगितले की, मराठी साहित्य संमेलनाची परंपरा काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपूर्वीपासून सुरू आहे. त्यामुळे या संमेलनाचा इतिहास हा केवळ साहित्यापुरता मर्यादित नसून तो देशाच्या वैचारिक जडणघडणीशी जोडलेला आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला या संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत त्यांनी या निवडीमागील सामाजिक आशय अधोरेखित केला.
पाटील-कुलकर्णी युतीचा संदर्भ
आपल्या भाषणात विश्वास पाटील यांनी एका खास उपमेच्या माध्यमातून समाजरचनेवर भाष्य केले. “पाटील म्हटलं की अनेकांना कुस्तीचा फड, तमाशाचा फड किंवा उसाचा फड आठवतो. पण मी शब्दांच्या फडातला पाटील आहे,” असे सांगत त्यांनी टाळ्यांची दाद मिळवली. साहित्य संमेलनासाठी ‘एका पाटलाला अध्यक्ष करा’ अशी मागणी कुलकर्णी-जोशींनी केली होती, याचा उल्लेख करत त्यांनी पुढे म्हटले की, एखादा गाव सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्णी यांची युती होणे ही जुनी आणि प्रभावी परंपरा आहे.
सावरकर आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा
विश्वास पाटील यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक संदर्भही मांडला. 87व्या साहित्य संमेलनावेळी सावरकरांनी केलेल्या ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’ या विधानाचा मोठा गाजावाजा झाला होता, पण त्याच वेळी त्यांनी मातृभाषेतून शिक्षण देण्यावरही भर दिला होता, हे त्यांनी आवर्जून सांगितले. मराठी भाषेवर जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा साहित्यिकांनीच पुढाकार घेऊन लढा दिला, असा ठाम दावा त्यांनी केला.
विचारसंहिता विरुद्ध आचारसंहिता
सध्याच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेचा उल्लेख करत विश्वास पाटील यांनी साहित्यिकांची भूमिका वेगळी असल्याचे सांगितले. “तुमची आचारसंहिता काही आठवड्यांची असते, पण साहित्यिकांची विचारसंहिता ही अनेक पिढ्यांपर्यंत टिकते,” असे म्हणत त्यांनी साहित्याच्या दीर्घकालीन प्रभावावर प्रकाश टाकला.
सामाजिक प्रश्नांवर थेट भाष्य
शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे केवळ शासनाचे अपयश नसून संपूर्ण समाजाचेही अपयश असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच लोकशाही, समता आणि सामाजिक न्यायासाठी लेखणीतून लढा देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक करताना, विश्वास पाटील यांचे भाषण हे साहित्य, समाज आणि राजकारण यांना जोडणारे ठरले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाने केवळ साहित्यिक चर्चा नव्हे, तर समाजाला आरसा दाखवणारे प्रश्नही केंद्रस्थानी आणले, अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.
