दीर्घ प्रतीक्षेनंतर वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील घरांचा ताबा आज स्थानिक रहिवाशांना मिळणार आहे. राज्य सरकारतर्फे सकाळी 11 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात 556 नव्या सदनिकांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले असले तरी, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ठाकरे गटाचे इतर नेते या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे कळते.
advertisement
बीडीडी चाळ पुनर्विकास हा मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. रहिवाशांना अत्याधुनिक सुविधा असलेली घरे मिळवून देण्याच्या दृष्टीने हा टप्पा ऐतिहासिक मानला जात आहे. पहिल्या टप्प्यातील यशानंतर पुढील टप्प्यांसाठीही सरकारकडून तयारी सुरू आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमात आदित्य ठाकरे यांच्या गैरहजेरीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अर्थांनी पाहिले जात आहे.
1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता. तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, अखेर 14 ऑगस्ट 2024 रोजी माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाट्य मंदिरात सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, महेश सावंत यांचेही नाव कार्यक्रम पत्रिकेवर आहे. तर, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत यांचे नावदेखील कार्यक्रम पत्रिकेवर आहे. मात्र, आदित्य ठाकरे वगळता इतर ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
आदित्य ठाकरेंची अनुपस्थिति का?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा केला होता. आपल्याच मतदारसंघातील हजारो नागरिकांसाठीचा आजचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, आदित्य ठाकरे हे अनुपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच मंचावर नको, या विचारातून आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.