कुणाचे किती उमेदवार विजयी?
भाजप-12
शिवसेना-06
राष्ट्रवादी-16
ठाकरे-01
काँग्रेस-00
मनसे-00
शरद पवार गट-00
एमआयएम – 00
बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक केवळ शहरापुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणासाठीही महत्त्वाची ठरली आहे.
सर्व प्रमुख पक्षांना सत्तेची संधी
२००३ साली स्थापन झालेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेत आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या सर्व प्रमुख पक्षांना महापौरपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे या महानगरपालिकेवर कोणत्याही एका पक्षाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिलेले नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर बदलत्या आघाड्या, पाठिंबे आणि सत्तासंघर्ष हे येथील राजकारणाचे कायमचे वैशिष्ट्य ठरले आहे.
advertisement
ऐतिहासिक शहर, राजकीय केंद्र
पूर्वी अहमदनगर म्हणून ओळख असलेले आणि अलीकडे अहिल्यानगर असे नामकरण झालेले हे शहर सुमारे ५०० वर्षांचा समृद्ध इतिहास सांगते. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून या शहराची ओळख आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिक या प्रमुख शहरांच्या जवळीकमुळे अहिल्यानगरचे भौगोलिक आणि राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात महानगरपालिका हद्दीत जवळपास ३ लाख ७ हजार मतदार आहेत. स्वातंत्र्यानंतरपासूनच हा जिल्हा राज्याच्या राजकारणात प्रभावी मानला जातो.
चुरशीच्या लढतींची परंपरा
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नेहमीच रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारखे मूलभूत प्रश्न केंद्रस्थानी राहिले आहेत. या प्रश्नांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाने ताकद लावल्याने निवडणुका नेहमीच अटीतटीच्या झाल्या आहेत. निकालानंतर महापौरपदासाठीही अनेकदा अनपेक्षित घडामोडी घडल्याचा इतिहास आहे.
महापौरपदाची दोन दशकांची वाटचाल
गेल्या वीस वर्षांत महापौरपदावर विविध पक्षांचे प्रतिनिधी विराजमान झाले. २००३ ते २००८ या काळात शिवसेनेचे भगवान फुलसौंदर आणि काँग्रेसचे संदीप कोतकर महापौर होते. २००८ ते २०१३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप आणि शिवसेनेच्या शीला शिंदे यांनी नेतृत्व केले. २०१३ ते २०१८ दरम्यान राष्ट्रवादीचे संग्राम जगताप व अभिषेक कळमकर, तर शिवसेनेच्या सुरेखा कदम महापौर राहिल्या. २०१८ ते २०२३ या कालखंडात भाजपचे बाबासाहेब वाकळे आणि शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी शहराचे नेतृत्व केले.
२०१८ चा निकाल आणि सत्तासंघर्ष
डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना २४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला १८, भाजपला १४ आणि काँग्रेसला ५ जागा मिळाल्या होत्या. संख्याबळ कमी असूनही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपला महापौरपद मिळाले होते. त्यानंतर राज्यातील सत्तांतराचा थेट परिणाम महानगरपालिकेतील राजकारणावर दिसून आला.
