अहिल्यानगरमध्ये आक्रमक झालेले मुस्लीम धर्मीय आणि त्यांना आवर घालणारे पोलीस कर्मचारी असे दृष्य सोमवारी सकाळी महाराष्ट्राने पाहिले. अहिल्यानगरमधील या वादाचं कारण ठरलंय, आय लव्ह मोहम्मदची रांगोळी. या रांगोळीमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावरून मुस्लीम समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. शहरातील कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर अपमानास्पद मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला आणि आंदोलकांना बाजूला करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला.
advertisement
खरतंर जवळपास दोन आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेशात सुरू झालेला वाद आता हळूहळू राज्यात पसरू लागला आहे. कानपूरमध्ये 'ईद मिलाद-उन-नबी'निमित्त 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर लावण्यात आले. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशसह देशातील अनेक शहरांत मुस्लीम समाजानं आंदोलनं केली. उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये 'आय लव्ह मोहम्मद' बॅनरसह काढलेल्या मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्कीही झालेली याप्रकरणी पोलिसांकडून अटकेची कारवाईही करण्यात आलेली. तसंच उन्नावमध्ये रविवारी निघालेल्या मोर्चाप्रकरणीही पोलिसांनी 5 जणांना अटक करण्यात आली.
आय लव्ह मोहम्मदच्या या पोस्टर विरोधात आता 'आय लव्ह महादेव' आणि 'आय लव्ह राम' असं पोस्टवर वॉर रंगलंय. उत्तर प्रदेशातील हे वारं दोन दिवसांपूर्वी मुंबईत पोहोचलं होतं. मुंबईतही आय लव्ह महादेव आणि आय लव्ह रामचे बॅनर पाहायला मिळाले. पण, आता ग्रामीण भागातही हा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान अहिल्यानगरमधील या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. विरोधकांनी या घटनेवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तर मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या वोट जिहादच्या दाखला देत पलटवार केला.
'आय लव्ह मोहम्मद'ची बॅनरबाजी आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून लावले जाणारे आय लव्ह महादेव, आय लव्ह रामचे पोस्टर्स यावरुन राजकारण तापलंय. पण,अशा घटनांमुळे महाराष्ट्रातील पुरोगामित्वाला आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का बसणार नाही ना? राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार तर नाही का? याचा सर्वांनीच विचार करायला हवा.