शिर्डीची जागा आठवलेंना सोडावी अन्यथा आरपीआय शिर्डी आणी अहमदनगर दक्षिण मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचं आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले सुरूवातीपासून शिर्डी मतदारसंघासाठी आग्रही होते. मात्र ही जागा शिवसेनेला देण्यात आली असून उमेदवारही जाहीर करण्यात आला आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्ते आजही आग्रही असून श्रीरामपूर येथे निर्धार मेळावा घेत शिर्डीचा उमेदवार बदलावा आणी हि जागा आठवलेंना सोडली जावी अशी मागणी करत आक्रमक झाले आहेत.
advertisement
आरपीआय आठवले गटाच्या अस्तीत्वाची ही निवडणूक आहे. राज्यात महायुतीला निवडून येण्यासाठी आरपीआयच्या मतांची गरज आहे. त्यामुळे शिर्डी आणी सोलापूरची जागा आठवले गटाला दिली जावी अशी मागणी आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी दिलीय. जर जागा सोडली नाही तर अहमदनगर दक्षिण आणी शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय.
रामदास आठवले यांची यासंदर्भातील नाराजी दूर झाली आहे. पण कार्यकर्ते मात्र उमेदवारीसाठी आक्रमक झाले आहेत. आरपीआयच्या अस्तित्वासाठी निवडणूक लढण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निर्धार मेळावे घेतले जाणार आहेत. आठवले गटाच्या निर्धार मेळाव्यानंतर जर त्यांनी उमेदवार उभे केले तर यामुळे महायुतीच्या अडचणी वाढू शकतात.
