शिवसेनेत फूट पडल्यानंतर पुढच्या काही महिन्यात राष्ट्रवादीतही फूट पडली. अजित पवार यांनीही ४० आमदारांना सोबत घेऊन सत्तेशी जुळवून घेणे पसंत केले. दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकमेकांसमोर लढवल्यानंतर आता एकत्र येण्याची 'हिच ती वेळ' असे म्हणत महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधून एकत्रिकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत एकत्रिकरणासंदर्भात मोठे विधान केले.
advertisement
शरद पवारांच्या आमदार खासदारांना अजित पवारांची साथ का हवी आहे?
आमच्या पक्षाच्या एकत्रिकरणासंदर्भात सध्या कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही. पण आम्ही एकत्र यावे, असा विचार केला, त्यादिशेने पावले टाकायला सुरुवात केली की माध्यमं आम्हाला खूप प्रश्न विचारतात, असे अजित पवार म्हणाले. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार मला भेटायला आले की निधीबद्दल (फंड्स) बोलतात. आम्हाला विकासनिधी मिळत नाही, अशी तक्रार करतात, त्यामुळे आपण आता एकत्र आले पाहिजे, असे ते मला म्हणतात, असे अजित पवार यांनी सांगितले.
लागोपाठ पाच पाच वर्षे विरोधात बसल्यानंतर आमदार-खासदार त्रस्त होतात
जुन्या काळातील राजकारण वेगळे होते. त्यावेळी विरोधी पक्षात बसले तरी विकासनिधी मिळत असे. परंतु आताच्या काळातील राजकारण बदलले आहे. बदललेल्या राजकारणात सत्तापक्षात असल्यानंतर विकासनिधी मिळायला सोपे होते. लागोपाठ पाच पाच वर्षे विरोधात बसल्यानंतर आमदार-खासदार त्रस्त होतात, असे अजित पवार म्हणाले.
ज्याला जसे जमेल तसे तो युती करतोय, अजित पवार यांची टोलेबाजी
राज्यातील महापालिका निवडणुकांत वेगवेगळी समीकरणे पाहायला मिळत आहेत. कुठे कुणाशी युती-आघाडी होत आहे. कुणी एमआयएमशी युती करतेय, कुणी काँग्रेसशी तर कुणी वंचितशी. ज्याला जसे जमेल तशी युती होत आहे, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.
