अजित पवारांच्या निधनानंतर व्हीएसआर व्हेंचरच्या सर्व लिअरजेट विमानांच्या उड्डाणांना मनाई करण्यात आली आहे. अपघातानंतर कंपनीच्या विमानाचे विशेष ऑडिट करण्यात आले होते. ऑ़डिटमध्ये उणिवा आढळल्याने विमानंच्या उड्डणास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये VT - VRA, VT - VRS, VT - VRV आणि VT - TRI या चार विमानांवर बंदी घातली आहे.
advertisement
DGCA ने पत्रात नेमकं काय म्हटलंय?
बारामती येथे 28 जानेवारी रोजी झालेल्या मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या लिअरजेट 45 विमानाच्या (व्हीटी-एसएसके) अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संस्थेचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले. बहु-विद्याशाखीय ऑडिट टीमने संस्थेमध्ये हवाई योग्यता, हवाई सुरक्षा आणि उड्डाण ऑपरेशन्सच्या क्षेत्रात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
निरीक्षण केलेल्या गंभीर चुका तथा त्रुटी लक्षात घेता नोंदणीकृत लिअरजेट 40/45 विमानांना तात्काळ ग्राउंडिंग करून सुधारणात्मक उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीजीसीएकडून पुढील मूल्यांकनासाठी गैर-अनुपालनांचे मूळ कारण विश्लेषण सादर करण्यासाठी वरील उल्लेखित क्षेत्रांमध्ये मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला कमतरता अहवाल फॉर्म जारी करण्यात आले आहेत.
काय म्हणाले होते रोहित पवार?
अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी बाकावरील अनेक पक्षांच्या नेत्यांनी या अपघाताविषयी संशय व्यक्त केला आहे. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी मुंबई व दिल्लीत विस्तृत पत्रकार परिषदा घेत VSR विमान कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते
व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीच्या जागतिक रेकॉर्डवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "परदेशातही या कंपनीने एका घटनेचा अहवाल दिला नव्हता, ज्यामुळे युरोपियन एजन्सींनी या कंपनीचे परवाने रद्द केले होते. मात्र, तरीही या कंपनीची विमाने भारतात उडविली जात आहेत. अजित दादांचा मृत्यू होऊनही या कंपनीवर अद्याप बंदी का घातली जात नाही? असा सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर डीजीसीएने केलेल्या ऑडिटमध्ये उणीवा आढळल्यानंतर या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.
