अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. उपमुख्यमंत्रिपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आली आहे. तर पार्थ पवार यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीत अजित पवार यांचे सुपूत्र जय पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. पार्थ पवार खासदार होऊन राज्यसभेत पक्षाची बाजू मांडतील तर जय पवार पक्ष संघटनेत काम करतील.
advertisement
जय पवार यांच्या सोबत सना मलिक, सरोज अहिरे, शेखर निकम आणि चेतन तुपे यांचीही पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारीणीत समावेश करण्यात आला आहे. आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ नेत्यांना स्थान दिलं जात होतं. पण, पहिल्यांचा इतकी तरुण कार्यकारिणी सदस्यांना संधी देण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी आता पूर्ण यंग ब्रिगेडला संधी दिली आाहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नाहीच!
दरम्यान, सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 26 फेब्रुवारीला पाठवलेलं पत्र समोर आलं आहे. या पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्याशिवाय फक्त शिवाजीराव गरजे यांचा खजिनदार म्हणून उल्लेख आहे.
26 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याचवेळी हे ठराव पारित करण्यात आले होते. विशेष म्हणजे 10 मार्च रोजी हे ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला कळवले आणि त्याचवेळी हे देखील नमूद केले की 28 जानेवारी नंतरचा कोणताही पत्रव्यवहार अधिकृत म्हणून गृहीत धरला जाऊ नये. 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीतील निर्णय आणि पदाधिकारी यादी आम्ही आत्ता निवडणूक आयोगाला सादर करत आहोत. सुनेत्रा पवारांकडून फक्त 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, सुनील तटकरे यांचाही प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नाही आणि प्रफुल्ल पटेल यांचाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा उल्लेख आहे आणि खजिनदार म्हणून शिवाजीराव गरजे यांचा उल्लेख आहे.
तर संघटनात्मक निवडणूक रचना म्हणून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, सरोज अहिरे, जय पवार आणि धीरज शर्मा यांचा उल्लेख केला आहे.
