मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अमेडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने तब्बल 1 हजार 804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अजित पवारांच्या दुसऱ्या मुलावर देखील भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अजित पवारांचे दुसरे चिरंजीव हे दारुच्या कंपनीतून भ्रष्टाचार करत असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
advertisement
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अजित पवार त्यांची संपत्ती लपवण्याकरता आणि जेलमध्ये जाण्याच्या धमकीमुळे भाजपाकडे गेले आहे. भाजपकडे गेल्यानंतरही अजित पवारांचे जे कारनामे सुरू आहेत. दोन्ही मुलांना नंबर दोनचे धंदे करायला लावतात आणि स्वतः दस नंबरी बनून उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची बळकवून ठेवली आहे.
सपकाळांनी कोणत्या प्रकरणात दुसऱ्या मुलाचा केला उल्लेख
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अजित पवार यांच्या एका मुलाचा भ्रष्टाचार हे पुण्यातल्या या जमिनीच्या प्रकरणातून आलेला आहे. दुसरे जे चिरंजीवांची त्यांची टँगो नावाची दारू कंपनी आहे. या देशी दारूच्या टँगो कंपनीला लाभ देण्याच्या अनुषंगाने अजित पवार यांनी अनेक निर्णय घेतले आहे. टँगो या कंपनीला संरक्षण देण्यासाठी त्या विभागात अबकारी विभागाचं मंत्रिपदसुद्धा अजित पवारांनी आपल्याकडे ठेवले आहे, जेणेकरून दुसऱ्या मुलाला टॅंगोच्या माध्यमातून लाभ दिला जाईल. त्यामुळे असा डबल धमाका डबल भ्रष्टाचार डबल दोन नंबरचे काम अजित पवारांकडून सरसकट सर्रास सुरू आहे.
अजित पवार यांना भस्म्या नावाचा आजार : हर्षवर्धन सपकाळ
आम्ही कर्जमाफीसाठी टाहो फोडत आहोत शेतकरी हवालदिल आहे. त्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारला तर आपली तळपायातली आग मस्तकात जाते. अजित पवार ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्याच जिल्ह्यात ते मुलाला स्टॅम्प ड्युटी माफ करतात. अजित पवार यांना भस्म्या नावाचा आजार झाला आहे. भस्म्या या नावाचा आजार झाल्यावर किती खाल्लं तरी अधिक खावाच वाटते, पहिलेच एवढं खाल्लेला आहे अजून किती खाणार, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या आरोपावर अजित पवारांची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत.
हे ही वाचा :
