अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा यावर संशय व्यक्त केला आहे. हा अपघात आहे, असं मला वाटत नाही. हा घातपातच असू शकतो, असा संशय मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. शिवाय त्यांनी विमानात सहा लोक होते, अशी माहिती सुरुवातीला समोर आली. पण प्रत्यक्षात पाचच लोकांचे मृतदेह कसे आढळून आले? याचं उत्तर प्रशासनानं द्यावं, अशी मागणी मिटकरी यांनी केली.
advertisement
याशिवाय हा विमान अपघात होता, तर मृतदेह लगेच फुगला कसा काय? असा सवालही मिटकरी यांनी उपस्थित केला. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं आणि अजित दादांच्या अपघाताची सत्यता महाराष्ट्रासमोर आणावी, अशी मागणी देखील मिटकरींनी केली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरींनी हे वक्तव्य केलं आहे.
...तर घरात पाळणा हलवायला कुणी शिल्लक राहणार नाही
अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, हा अपघात नाही, घातपात असावा, अशी आम्हाला शंका आहे. आमची शंका खरी ठरली आणि यात घातपात असल्याचं समोर आलं, यात कुणाचा हात असेल तर त्याच्या घरात पाळणा हलवायला कुणी शिल्लक राहणार नाही, अशी धमकी देखील अमोल मिटकरींनी दिली. तसेच मी स्वत: केंद्रीय रेल्वेमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेण्याची तयारी ठेवली आहे. मला वेळ मिळाल्यानंतर मी दिल्लीला जाईन, त्यांची भेट घेऊन याबाबत चौकशीची मागणी करेन. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहे, असंही मिटकरींनी सांगितलं.
हा घातपात वाटत नाही- शरद पवार
अमोल मिटकरींकडून अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली जात असली तरी शरद पवार यांनी पहिल्याच दिवशी घातपाताची शक्यता नाकारली होती. हा अपघातच आहे. अजित पवारांच्या मृत्यूचं कुणी राजकारण करू नये, अशा आशयाचं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. यावरही मिटकरींनी प्रतिक्रिया दिली असून लोकभावनेचा उद्रेक घडू नये, म्हणून शरद पवार तसे म्हणाले असावेत, असं स्पष्टीकरण मिटकरींनी दिलं.
