सोनल अग्रवाल यांचा पुढाकार
वरूड शहरातील नामांकित सामाजिक कार्यकर्त्या तसेच श्रद्धा शिक्षण केंद्राच्या संचालिका सोनल अग्रवाल यांनी या उपक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. विधवा महिला म्हटलं की आजही अनेक ठिकाणी त्यांना शुभकार्यांपासून दूर ठेवले जाते. या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी आणि महिलांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी दरवर्षी विधवा महिलांचे हळदी-कुंकू आयोजित करण्यास सुरुवात केली.
advertisement
10 तोळे सोनं अन् 20 लाख हुंडा, तरीही लग्न मोडलं, पुण्यातील कुटुंबाची नको ती डिमांड, काय घडलं?
लोकल18 शी बोलताना सोनल सांगतात की, विधवा महिलांनाही आनंदी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती मिळवून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. भविष्यात सुहासिनी महिलांप्रमाणेच विधवा महिलाही हळदी-कुंकवाला जातील, हा माझा ध्यास आहे.
या संकल्पनेमागची हळवी घटना
या उपक्रमाची सुरुवात एका हृदयद्रावक घटनेतून झाली. श्रद्धा शिक्षण केंद्रात शिवणकाम व पार्लर प्रशिक्षणासाठी येणाऱ्या एका महिलांचे पती अवघ्या तीन महिन्यांपूर्वी निधन पावले होते. संक्रांतीच्या सणादरम्यान ती महिला माझ्याकडे आली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगू लागली, “दरवर्षी माझ्या कॉलनीत माझ्याशिवाय हळदी-कुंकू होत नव्हतं. पण यावर्षी मला बोलावलंही नाही.” या शब्दांनी माझे मन अस्वस्थ झाले आणि तेव्हाच विधवा महिलांचे हळदी-कुंकू ही संकल्पना आकाराला आली. आज तब्बल दहा वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे.
यावर्षी 24 जानेवारी रोजी विधवा महिलांचे हळदी-कुंकू उत्साहात पार पडले. या वेळी महिलांना वाण म्हणून शृंगार साहित्य देण्यात आले. मेहंदी, गजरा यांसारख्या गोष्टी प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. मात्र, पतीच्या निधनानंतर अनेक महिलांकडून हा आनंद हिरावून घेतला जातो. तोच आनंद पुन्हा त्यांच्या आयुष्यात परत यावा, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.
पुरुषांची आणि संस्थांचीही साथ
या उपक्रमाला केवळ महिलांचाच नव्हे, तर पुरुषांचाही भक्कम पाठिंबा मिळत आहे. वरूड शहरातील अनेक नागरिक, तसेच विविध सामाजिक फाउंडेशन या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यामुळे हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता सामाजिक परिवर्तनाची चळवळ बनत चालला आहे.
समाजाला दिशा देणारा उपक्रम
जुन्या आणि अनिष्ट रूढी-परंपरांना मागे टाकत विधवा महिलांच्या आयुष्यात आनंद, आत्मसन्मान आणि समानतेची भावना निर्माण करणारा ‘रणरागिणी विधवा महिलांचे हळदी-कुंकू’ हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. पुढील काळातही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असून, समाजाच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य करणार आहे.





