जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही वेळेआधीच निघाल्याने अमरावती येथील 11 पर्यटक हे दहशतवादी हल्ल्यातून बचावले आहे. सध्या हे सर्वजण श्रीनगरमधील ‘हॉटेल डेव्हलिप लँड’ येथे सुरक्षित आहेत.
या पर्यटकांमध्ये मंगला बोडके यांचा परिवार, छाया देशमुख, निता उमेकर, चंदा लांडे आणि सारिका चौधरी यांचे कुटुंबीय सहभागी आहेत. ते सर्वजण एकत्रितपणे पर्यटनासाठी पहलगामला गेले होते. पहलगाममध्ये या पर्यटकांनी निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेतला. त्या ठिकाणी मनसोक्त फोटो काढले, व्हिडीओ काढले, रील्सही बनवले. पहलगाममध्ये पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर अमरावतीमधील या पर्यटक तिथून निघाले. त्यानंतर काही वेळेत दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्याची बातमी समजताच अमरावतीत त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंता पसरली होती. मात्र श्रीनगरमधून मिळालेल्या माहितीनुसार सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली.
advertisement
मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात डोंबिवलीतील तीन, पुण्यातील दोन तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील इतर काही पर्यटक देखील जखमी असल्याचीही माहिती आहे. संबंधित पर्यटक घोडेस्वारी करत असताना नाव विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. मृतांमध्ये डोंबिवलीतील संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे आणि पनवेलमधील दिलीप देसले यांचा समावेश आहे.
