मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या वॉरंटनंतर अटक होण्याची भीती वर्तवली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आंदोलन करत असतानाच त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यामळे वेगवेगळ्या चर्चांना सुरूवात झाली होती. त्यातच जरांगे पाटलांनीही अटक झाल्यास मराठा समाजाला भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचं थेट आवाहन केलंय. कैद्यांमार्फत मारण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय.
advertisement
जरांगेंविरोधात अटक वॉरंट का?
सदर प्रकरण हे 2013 मधील आहे. पुण्यात कोथरूडमध्ये जरांगे पाटील यांनी नाटकांचे प्रयोग आयोजित केले होते. मात्र त्याचे पैसे दिले नाहीत, असा आरोप त्यांच्यावर आहे. त्या प्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयामध्ये खटला सुरू होता. मात्र खटल्याच्या सुनावणीला मनोज जरांगे पाटील हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावलं होतं. न्यायालयाच्या समन्सनंतर जरांगे एकदा कोर्टात हजर झाले होते. मात्र पुढच्या तारखांना ते गैरहजर राहिले. परिणामी पुणे न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलंय.
दरम्यान अजय बारसकर यांनी जरांगेंवर पलटवार केला आहे. जरांगे फ्रॉड आणि 420 असल्याचा हल्लाबोल बारस्कर यांनी केलाय. आर्थिक फसवणूक प्रकरणातून बजावण्यात आलेल्या अटक वॉरंटचा मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासोबत संबंध जोडल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जोरदार समाचार घेतलाय. जरांगे पाटलांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
