औरंगजेबाच्या कबरीविरोधात नागपूरमध्ये आंदोलन झाले. या आंदोलनात झालेल्या कथित चादर जाळण्यावरून वातावरण तणावपूर्ण झाले आणि त्याचे पर्यावसन दंगलीत झाले. या दंगलीतील आरोपींना अटक करण्यात येत आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. तर, दुसरीकडे राज्यात इतर ठिकाणी तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. औरंगजेब कबर वादावर केंद्राचे बारीक लक्ष आहे. ती एनआयएचे तीन पथक मराठवाड्यात दाखल झाले आहे.
advertisement
एनआयएचे कोणत्या मुद्यावर लक्ष?
औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या आडून कोणतीही दहशतवादी कारवाई होऊ नये यासाठी एनआयए दक्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्लिपर सेल आणि सीरियाशी संपर्कात असलेल्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याशिवाय काही हिंदुत्ववादी संघटनांच्या काही नेत्यांवर एनआयएची पाळत ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे.
नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांची कारवाई...
नागपूर दंगलीमधील आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोपींविरोधात नागपूर दंगल प्रकरणात आरोपी फहिम खान आणि इतर आरोपींवर BNS 152 अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवण्यास प्रवृत्त करणारे ते 172 व्हिडीओ सायबर पोलीसांच्या हाती लागले आहेत. CCTV आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे. नागपूरमधील दंगल प्रकरणी मागील दोन दिवसात जवळपास 90 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
