हिंगोली: चोर कशी चोरी करेल याचा नेम नाही. हिंगोलीमध्ये एक सिनेस्टाईल चोरीची घटना समोर आली आहे. एका टोळीने बँकेच्या मॅनेजरवर नजर ठेवली आणि जेव्हा पैसे घेऊन निघालाा तेव्हा अपघाताचा बनाव करून पैसे घेऊन पसार झाले. बँके मॅनेजरकडून 8 लाख रुपयांची बॅग घेऊन दरोडेखोर पसार झाले होते. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर या दरोडेखोरांचा शोध लावला आहे. हे दरोडेखोर आंध्र प्रदेश मध्ये पसार झाले होते. या ९ दरोडेखोरांना पोलिसांनी पकडून आणलं आहे. त्यांच्याकडून दरोड्यातील रकमेसह 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कोर्टा पाटी परिसरात ही घटना घडली होती. या परिसरात एका बँकेच्या मॅनेजरला दरोडेखोरांनी लुटल्याची घटना ९ जानेवारी रोजी घडली होती. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चोंढीचे मॅनेजर ज्ञानोबा भोसले हे आपल्या दुचाकीवरून ८ लाख रुपये रक्कम असलेली बॅग घेऊन वसमतहून चोंढीकडे येत होते. दरम्यान, कोर्टापाटी परिसरात आले असता एका पिकप टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रोडच्या बाजूला जखमी अवस्थेत पडले.
याचवेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चार दरोडेखोरांनी त्यांची पैसे असलेली बॅग हिसकावून पळ काढला. याच दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तांत्रिक विश्लेषण आधारे गुन्ह्यातील तीन आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीत पोलिसांना निष्पन्न झालं. उर्वरित सहा दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरुंदा पोलीस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले.
६ जण आंध्राला पळून गेले
पळून गेले सहा दरोडेखोर हे आंध्र प्रदेश मध्ये तिरुपतीला जाणार असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. हे सहा दरोडेखोर आंध्र प्रदेशातील बापटला शहरात असल्याचा छडा पोलिसांनी लावला. आणि स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरुंदा पोलीस ठाण्याचे संयुक्त विशेष पोलीस पथक आंध्र प्रदेशकडे रवाना झाले. पोलिसांनी बापटला शहरात दडून बसलेल्या दरोडेखोरांना मुसक्या आवळून हिंगोलीला आणलं.
दरोडेखोरांकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या दरोडेखोरांकडून सहा लाख 70 हजार रुपये रकमेसह गुन्ह्यात वापरलेली वाहने असा सर्व मिळून वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अत्यंत जलद गतीने तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी या दरोड्याचा छडा लावला. त्याचबरोबर दरोडेखोरांच्या टोळीला दुसऱ्या राज्यातून मुसक्या आवळून हिंगोलीत आणत दमदार कामगिरी केली आहे.
