नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी मृत मुलाचे वडील रामदास ननवरे आपला मुलगा स्वराज आणि पत्नी स्वाती यांच्यासह बीड शहरात खासगी कामानिमित्त गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर हे कुटुंब दुचाकीने परत आपल्या गावी राजुरी नवगणच्या दिशेनं निघाले. बीड शहरापासून काही अंतर लांब गेल्यानंतर या कुटुंबाला रस्त्याच्या कडेला एक कुत्र दिसलं. या कुत्र्याचं मुंडकं प्लास्टिकच्या बरणीत अडकलं होतं. मुंडकं काढता येत नसल्याने कुत्रं वेदनेनं विव्हळत होतं. हे पाहून कुत्र्याची मदत करण्यासाठी कुटुंबानं गाडी थांबवली.
advertisement
तिघे दुचाकीवरून उतरून कुत्र्याची मदत करणार होते, तितक्यात पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या दुचाकीनं या कुटुंबाला धडक दिली. गाडीचा हँडल स्वराजच्या डोक्यात लागला आणि तो गंभीर जखमी झाला. तर या अपघातात रामदास यांच्या पत्नी स्वाती यांनाही दुखापत झाली. अपघाताची घटना घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलाचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
एका कुत्र्याला मदत करण्यासाठी थांबलेल्या कुटुंबावर अशाप्रकारे काळानं घाला घातल्याने राजुरी नवगण गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी रामदास ननवरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वरावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सोमनाथ जायभाय करत आहेत.