हराळी गावचे रहिवासी राहुल पाटील (वय 45) यांचा संसार समाधानात सुरू होता. मात्र, मागील वर्षभरापासून त्यांच्या आरोग्यात सातत्याने बिघाड होत गेला. वैद्यकीय तपासणीत दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. नियमित डायलिसिस करूनही प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. अखेर डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. ही बातमी कुटुंबासाठी धक्कादायक ठरली. घरचा कर्ता पुरुष आजारपणामुळे खचल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत सापडले होते.
advertisement
'1 महिला 2 चिमुरडी मुलं भाड्याने भिकारी मिळतील' रेट कार्ड तयार, छ.संभाजीनगरातला धक्कादायक प्रकार
या कठीण प्रसंगी पत्नी वर्षा पाटील (वय 40) यांनी खचून न जाता धाडसी निर्णय घेतला. चिंचोली भुयार (जि. धाराशिव) हे माहेर असलेल्या वर्षा यांनी पतीच्या उपचारासाठी स्वतः पुढाकार घेतला. “पतीचे प्राण वाचवणे हेच माझे कर्तव्य,” या भावनेतून त्यांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय तपासण्या आणि आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्या दात्या म्हणून पात्र ठरल्या. या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाला आशेचा नवा किरण मिळाला.
21 जानेवारी 2026 रोजी पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने वर्षा पाटील यांची एक किडनी काढून ती राहुल पाटील यांना प्रत्यारोपित केली. शस्त्रक्रियेनंतर दोघांचीही प्रकृती समाधानकारक असून, राहुल पाटील यांना अक्षरशः नवे आयुष्य मिळाले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुढील काळात योग्य काळजी घेतल्यास दोघेही सामान्य जीवन जगू शकतील.
आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या काळात वर्षा पाटील यांनी दाखवलेला हा त्याग केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहिलेला नाही. पती-पत्नीच्या नात्यातील विश्वास, प्रेम आणि समर्पण किती महान असू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. हराळी गावासह संपूर्ण परिसरात वर्षा पाटील यांच्या धैर्याचे आणि निर्णयाचे कौतुक होत असून, अनेकांसाठी त्या ‘आधुनिक सावित्री’ ठरत आहेत.






