काय आहे संकट?
नारळाच्या झाडांवर गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव वाढलाय. भारतामध्ये नाराळाच्या झाडाला हा नेहमीच धोका असतो, अशी माहिती कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी दिलीय. झाडाला बुरशी लागणे, फळं गळणे या प्रकारची लक्षणं यामध्ये सुरुवातीला दिसतात. तुमच्या नारळाच्या झाडाला हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याचा उपाय देखील चांडक यांनी सांगितला आहे.
advertisement
वीज बिलाच्या टेन्शनमधून होईल शेतकऱ्याची सुटका! 'या' सरकारी योजनेला जबरदस्त प्रतिसाद
गेंडा भुंगा हा मध्यम आकाराचा असून, रंगाने गडद तपकिरी किंवा काळा असतो. त्याच्या डोक्यावर पाठीमागच्या बाजूस गेंड्यासारखे एक शिंग असल्यानेच या किडीला 'गेंड्या भुंगा' असे म्हटले जाते. प्रौढ भुंगा नारळाच्या झाडाचे नुकसान करतो. गेंड्या भुंग्याच्या अंडी, अळी आणि कोष या तीनही अवस्था शेणखत तसेच कुजलेल्या पालापाचोळ्यामध्ये आढळतात.
काही वेळेस न उमललेली पोयदेखील भुंगा कुरतडून खातो. ही पोय न उमलता वाळते. त्यामुळे याचा परिणाम नारळाची वाढ आणि उत्पादनावर होतो. नवीन सुई कुरतडली गेल्यामुळे लागण झालेल्या झाडाच्या झावळ्या त्रिकोणी आकारात कात्रीने कापल्यासारख्या दिसतात. या प्रमुख लक्षणावरून या किडीचा प्रादुर्भाव सहज ओळखता येतो. लहान झाडांबरोबर मोठ्या झाडांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत या भुंग्यांची तीव्रता जास्त आढळते, अशी माहिती चांडक यांनी दिली.
धार्मिक कार्यात महत्त्वाचे असलेल्या विड्याच्या पानाचे आरोग्यासाठी आहेत आश्चर्यकारक फायदे
नियंत्रणाचे उपाय
बाग स्वच्छ ठेवणे - कुजलेला पालापाचोळा तसेच तोडलेल्या नारळाच्या खोडांचे अवशेष बागेत ठेवू नयेत. शेणखताची साठवण नारळ बागेत किंवा जवळपास करू नये. शेणखतात आढळणाऱ्या अंडी, अळी आणि कोष या अवस्था वेळोवेळी गोळा करून त्यांचा नाश करावा.
शेणखताच्या खड्ड्यावर दर दोन महिन्यांच्या अंतराने 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारिल भुकटी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फसवे खड्डे तयार करा - नारळ बागेमध्ये 60 सें.मी. लांब, 60 सें.मी. रुंद व 60 सें.मी. खोल या आकाराचे फसवे खड्डे तयार करून त्यामध्ये कुजलेला पालापाचोळा, शेणखत भरून घ्यावे. या खड्ड्यांवर 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारिल भुकटी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे या खड्ड्यात तयार होणाऱ्या भुंग्यांच्या तिन्ही अवस्थांचा नायनाट होईल, असे चांडक यांनी स्पष्ट केले.