>> काय आहे भाजपचा गेम प्लॅन
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या अर्धा ते एक तास आधीच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बी फॉर्म देण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे.
>> बी फॉर्म का महत्त्वाचा?
advertisement
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचा बी फॉर्म जोडणे बंधनकारक नसते. मात्र अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपण्यापूर्वी बी फॉर्म सादर करणे आवश्यक असते. ज्या उमेदवाराकडे पक्षाचा बी फॉर्म असतो, त्यालाच अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता दिली जाते आणि पक्षचिन्हही त्यालाच मिळते. याच नियमाचा वापर करत भाजपने बी फॉर्म शेवटच्या क्षणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपरिषद निवडणुकांत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. अनेक महापालिकांमध्ये एका जागेसाठी तब्बल ७५ ते १०० इच्छुकांनी अर्ज केल्याने अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीची शक्यता वाढली आहे. त्यामुळेच भाजपला इतर पक्षांच्या तुलनेत बंडखोरीची भीती अधिक असल्याचे चित्र आहे.
>> ३० मिनिटांचा प्लॅनचं कारण काय?
बी फॉर्म शेवटच्या क्षणी देण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ज्यांना तिकीट नाकारले जाईल, असे तगडे उमेदवार तातडीने इतर पक्षांकडून उमेदवारी मिळवू शकतात. ही संधीच बंद करण्यासाठी बी फॉर्म उशिरा देण्याची शक्कल लढवण्यात आली आहे. रविवारी रात्रीपर्यंत भाजपने एकाही महापालिकेची अधिकृत उमेदवार यादी जाहीर केलेली नव्हती.
बंडखोरी होणार नसल्याचा विश्वास, तरीही...
मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होणार नाही, असा विश्वास स्थानिक भाजप नेत्यांनी पक्ष नेतृत्वाला दिला आहे. मात्र, खबरदारी म्हणून भाजपच्या नेत्यांनी बंडखोरांना आवरण्यासाठी मोठा हा प्लॅन केल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, बी. एल. संतोष, मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली.
