राज्यातील महापालिका निवडणुका नेमक्या कधी जाहीर होणार, याबाबत सुरू असलेल्या चर्चेला गुरुवारी महत्त्वाची दिशा मिळाली. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत.
निवडणूक आयोग-महापालिका आयुक्तांच्या बैठकीत काय झालं?
गुरुवारी झालेल्या बैठकीत आयोगाने सर्व महानगरपालिकांना स्पष्ट मतदार याद्यांतील घोळ तातडीने दुरुस्त करा, दुबार मतदारांची घराघरांत जाऊन तपासणी करण्याचे निर्देश दिले. या कामासाठी ठोस मुदत दिल्याने निवडणुकीच्या घोषणेचा कालावधी आणखी स्पष्ट झाला आहे. येत्या १० डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीसाठीची मतदार यादी जाहीर करण्याची मुदत आहे. मात्र, महापालिका आयुक्तांनाी आयोगाकडे आणखी दोन दिवसांची मुदत मागितली आहे.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याची सक्त सूचना दिली आहे. नगरपरिषद–नगरपंचायत्या निवडणुकांचा पहिला टप्पा २ डिसेंबरला पार पडला असून, पुढील टप्प्याचे मतदान २० डिसेंबरला होणार आहे. दोन्ही टप्प्यांचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर होतील. यानंतर जिल्हा परिषद की महापालिका यापैकी कोणत्या निवडणुकीची घोषणा आधी करायची, यावर आयोगाचा निर्णय अपेक्षित आहे.
महापालिका निवडणुका कधी होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० डिसेंबरपर्यंत दुबार नावे हटवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यात काही ठिकाणी आणखी एक-दोन दिवस लागू शकतात. मात्र, २० डिसेंबरपर्यंत सर्व मतदारयाद्या शुद्ध केल्या जातील. त्यानंतर २२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्याशिवाय, २१ डिसेंबर रोजी राज्यातील नगर परिषद निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता २२ डिसेंबरपूर्वी महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबईसह इतरही महापालिका निवडणुकांची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक आरक्षणाच्या मुद्यावर विलंबाने होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक ही दोन टप्प्यात ही जाहीर केली जाऊ शकते. ५० टक्के आरक्षण न ओलांडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
