मुंबई महानगरपालिकेतील सत्तेचा पेच केवळ महापौर पदापुरता मर्यादित नसल्याचे समोर आले आहे. आता प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदावरूनही राजकीय आखाडा तापला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या समित्यांवर ताबा मिळवण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईतील ८ प्रभाग समित्या भाजप आपल्याकडे राखण्याची चिन्हे आहेत. तर, 'एस' (S) आणि 'टी' (T) प्रभाग समितीत सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ समसमान झाल्याने, येथील अध्यक्षपदाचा फैसला आता थेट 'ईश्वर चिठ्ठी'वर अवलंबून असणार आहे.
advertisement
भाजपचं 'मिशन मुंबई', ८ समित्यांवर दावा
जागांच्या स्ट्राइक रेटमध्ये सरस ठरलेल्या भाजपने मुंबईतील महत्त्वाच्या ८ प्रभाग समित्यांवर आपली पकड मजबूत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप सी आणि डी, के पश्चिम, पी दक्षिण, आर दक्षिण, आर उत्तर, आर मध्य, एम पश्चिम, एन विभाग आणि के दक्षिण या प्रभाग समित्यांमध्ये आपले वर्चस्व राखण्यात यशस्वी होईल.
ठाकरे गट आणि मनसे युतीचं ६ समित्यांवर लक्ष
दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि मनसे यांच्यातील अघोषित किंवा रणनीतिक युतीमुळे ६ प्रभाग समित्या त्यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. यात एफ दक्षिण आणि एफ उत्तर, जी दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम, के पूर्व आणि के उत्तर या विभागांचा समावेश आहे.
एमआयएमला जॅकपॉट...
यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ८ नगरसेवक निवडून आणणाऱ्या एमआयएमला 'एम-पूर्व' या प्रभाग समितीची सत्ता मिळणार आहे. त्यामुळे एमआयएमच्या कामगिरीवर सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
काँग्रेसचीही प्रभाग समितीवर सत्ता...
वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करणाऱ्या काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसलाही काही प्रभाग समिती मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाच्या साथीने २ प्रभाग समित्या आपल्याकडे राखण्याची संधी आहे. यामध्ये ए, बी आणि ई तसेच पी उत्तर आणि पी पश्चिम या प्रभाग समित्यांचा समावेश आहे.
प्रभाग समितीची कामे काय?
प्रभाग समिती हे नगरसेवक आणि नागरिक यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारात प्रभाग समिती अतिशय महत्त्वाची समजली जाते. रस्ते, पदपथ, उद्यान, बाजारपेठांची दुरुस्ती, गटार व्यवस्था, शाळा आणि दवाखान्यांची देखभाल यांसारख्या कामांसाठी प्रस्ताव तयार करणे व त्यांना मंजुरी देणे, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, कचरा व्यवस्थापन यांसारख्या दैनंदिन समस्यांवर उपाययोजना करणे आणि त्याबाबत महानगरपालिकेकडे पाठपुरावा करणे आदी कामे प्रभाग समितीच्या माध्यमातून होतात. नगरसेवकांच्या निधीतून (Councillor's fund) किंवा अर्थसंकल्पीय तरतुदीतून होणाऱ्या कामांना मंजुरी देण्याचा कामही प्रभाग समिती करते.
