मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची असून शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी भाजप-महायुतीकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. अशातच भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत सगळ्यांची झोप उडवणारी आकडेवारी समोर आली आहे.
advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणातून मोठे संकेत मिळाले आहेत. नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नव्या फॉर्म्युल्याच्या आधारे पालिकेची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेतून उघड झालेली आकडेवारी मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून काढणारी ठरत आहे. महायुतीत लढल्यास भाजपला मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
> महायुती की स्वबळावर? भाजपचा सर्व्हे काय सांगतो
भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार महायुतीसोबत लढल्यास मुंबई पालिकेत पक्षाला स्पष्टपणे फायदा होणार असल्याचं समोर आलं आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवक असलेल्या अनेक जागांवर भाजपचा जनाधार वाढल्याचे सर्व्हेत दिसून आले आहे. अंतर्गत सर्व्हेक्षणात पक्षाला १०० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
> ठाकरे गटाच्या १६ जागा भाजपच्या खात्यात?
सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे ३८ माजी नगरसेवक उरले आहेत. मात्र सर्व्हेक्षणात यापैकी तब्बल १६ जागांवर भाजपाला विजय मिळू शकतो, असं दाखवलं आहे. ठाकरे गटासाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
> काँग्रेसलाही फटका?
२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यातील १० नगरसेवक कमी झाले. ९ नगरसेवकांनी पक्ष सोडला, तर नगरसेविका प्रमिला पाटील यांचे निधन झाले होते. सर्व्हेनुसार काँग्रेसच्या ८ जागा भाजपकडे सरकताना दिसत आहेत.
> भाजप आपल्या जागा राखणार...
भाजपच्या विद्यमान ८२ जागा राखल्या जातील, यासोबत ठाकरे गटाच्या १६ आणि काँग्रेसच्या ८ जागा मिळून भाजपचा आकडा १००–१०६ च्या दरम्यान जाईल, असे सर्व्हेत समोर आल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.
>> ‘स्वबळा’वर मुंबईवर झेंडा नाहीच...
या मजबूत आकडेवारीनंतरही भाजपला फक्त स्वबळावर मुंबई महापालिका काबीज करणे शक्य नसल्याचे सर्व्हेतील आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मुंबईसारख्या महत्वाच्या महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेची साथ आवश्यक असल्याचं या सर्व्हेक्षणात ठळकपणे नमूद आहे.
>> जागा वाटपाचं सूत्र काय?
भाजप आणि शिंदे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चेला आता वेग येणार आहे. महायुतीत लढल्यास फायदा आहे हे सर्व्हेतून स्पष्ट झाल्यानंतर जागा वाटपावरील चर्चेला जोर येणार आहे. भाजपकडून मुंबईतील २२७ पैकी १५० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, शिवसेना शिंदे गटाने आपल्याला १२५ जागा मिळाव्यात अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
