अहिल्यानगर : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामखेड नगरपरिषद हद्दीतील जामवाडी या ठिकाणी एका भरधाव बोलेरो कारवरील नियंत्रण सुटलं आणि विहिरीत कोसळली. या अपघातात ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड नगरपरिषद हद्दीतील जामवाडी जामखेड या रस्त्याने दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. शॉट बोलेरो या चारचाकी वाहनाने रामहरी गंगाधर शेळके, अशोक विठ्ठल शेळके, किशोर मोहन पवार, चक्रपाणी सुनील बारस्कर येत होते. रस्त्याचे काम चालू असल्याने त्यावर खडी टाकलेली होती. वाहनचालकाला रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडलं. या दुर्घटनेत अशोक विठ्ठल शेळके (वय 29) रामहरी गंगाधर शेळके (वय 35), किशोर मोहन पवार (वय 30) आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर (वय 25) या चौघांचा मृत्यू झाला.
advertisement
ही घटना रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं आणि त्यांनी जामवाडी येथील ग्रामस्थांना बोलावलं. गावातील काही लोक तातडीने मदतीला धावून आले. कठडा व पायऱ्या नसलेल्या या विहिरीत दोरखंड लावून काही युवक उतरले. त्यांनी चारही युवकांना विहिरीतून बाहेर काढलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या सहकारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. या तरुणांना तातडीने समर्थ हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकनं दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या चारही तरुणाचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
