शिर्डी येथे भाजपचे प्रादेशिक महाअधिवेशन होत आहे. हे अधिवेशन पदाधिकाऱ्यांचे आणि जनतेचे आभार मानण्यासाठी घेतले जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. अधिवेशनामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचीही चर्चा होत असताना स्थानिक आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतील, मात्र प्रदेशाध्यक्षाची निवड होणार नाही असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पक्षात नवीन पदाधिकाऱ्यांना नेमणूक आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काम करण्यासाठी अधिवेशनातून संदेश दिला जाणार आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बावनकुळे म्हणाले...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये काम करत असताना आमचे सर्वांचे महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याचा विचार आहे. मात्र स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी वेगळे निर्णय घेतले तर त्याबाबतही पक्ष विचार करणार असून पदाधिकाऱ्यांच्या आग्रहावरून स्वबळावर निवडणुका लढवण्याबाबत विचार करेल असं बावनकुळे यांनी म्हटले.
जिल्हाधिकारी एक दिवस फिल्डवर
गतिमान प्रशासन चालावे यासाठी आठवड्यातील एक दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी फील्डवर जाऊन काम करावे, असे धोरण आम्ही लवकरच आणणार आहोत. जर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागासाठी दिला तरच प्रशासन हे गतिमान होऊ शकते. त्यामुळे हे धोरण महत्त्वाचे असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.
मविआमध्ये फुटीच्या चर्चा, बावनकुळेंची सडकून टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले . त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. यावर बावनकुळे म्हणाले, "महाविकास आघाडी ही केवळ देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तसेच केंद्रात भाजपचे सरकार येऊ नये यासाठी अस्थित्वात आली होती. त्यांच्यापुढे कोणत्याही प्रकारच्या विकासाचे धोरण नव्हते. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. महाविकास आघाडी ही विकासासाठी नाहीतर राज्य हे भकास करण्यासाठी निर्माण झालेली होती. त्यामुळे त्यांच्यात फूट ही पडणारच होती"
