तक्रारदार तरुणी ही बायजीपुरा परिसरातील असून, 6 मार्च 2022 रोजी तिचा विवाह भोकरदन येथील युवकासोबत पार पडला होता. लग्नावेळी तिच्या आई-वडिलांनी पतीला एक तोळा सोन्याची अंगठी, कपड्यांसाठी सुमारे तीस हजार रुपये तसेच संसारोपयोगी साहित्य दिले होते. लग्नानंतर काही दिवसांतच तिचा गर्भपात झाला. त्यानंतर पती, सासू, सासरे, जेठाणी, देवर आणि नणंद या सर्वांकडून तिला वारंवार त्रास दिला जाऊ लागला.
advertisement
किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मानसिक छळ तसेच पती आणि जावेने तिला मारहाण केल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. पुढील काळात तिला मुलगा झाला असला तरीही छळ थांबला नाही. 26 जून 2025 रोजी पतीने व्यवसायासाठी तिच्या माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने तिला मारहाण करण्यात आली आणि छळ वाढतच गेला, असा आरोप तिने केला आहे.
पतीचे तृतीयपंथीयासोबत संबंध
धक्कादायक बाब म्हणजे पतीचे एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. तो संबंधित व्यक्तीला घरी आणत असे आणि पत्नीला खोलीबाहेर हाकलून देत होता. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यानंतर तिची आई भोकरदन येथे जाऊन तिला घेऊन छत्रपती संभाजीनगरला आली. तेव्हापासून ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे.
दरम्यान, पतीने तिला किंवा त्यांच्या मुलाला परत नेण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नसल्याचेही तिने नमूद केले आहे. यानंतर गावातील लोकांकडून तिला पतीने दुसरे लग्न केल्याची माहिती मिळाली. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार विठ्ठल राठोड करत आहेत.






