शहरातील एकाच परिसरात राहणाऱ्या आलिया आणि मयुरी (नावे बदललेली) यांची मैत्री आठवीपासूनची आहे. वेगवेगळ्या धर्मांच्या असूनही त्यांची मैत्री घट्ट होती. सध्या दोघी अकरावीमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. दरम्यान, मयुरीच्या घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली आणि तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने ही बाब आपल्या मैत्रीण आलियाला सांगितली. “तू एकटी जाऊ नकोस,” असे म्हणत आलियानेही तिच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
advertisement
आजारी वडिलांना डबा द्यायला निघाली, मनस्वीसोबत भयंकर घडलं, छ. संभाजीनगर हळहळलं
17 मार्च रोजी सकाळी सुमारे आठ वाजता “कॉलेजला जाते” असे सांगून दोघी घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानक गाठून थेट मुंबईचा रस्ता धरला. तिथे जाऊन काम करून स्वतःचे आयुष्य उभे करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, मुली घरी परतल्या नाहीत, यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा काळे यांनी सुरू केला.
दरम्यान, मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या शहरात पोहोचल्यानंतर दोघी घाबरून गेल्या. परिस्थितीची जाणीव होताच त्यांनी घरी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. मयुरीने एका अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल घेऊन कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर कुटुंबीय आणि पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. दोघींना शोधून छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. 19 मार्च रोजी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतर दोन्ही मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.






