संभाजीनगर जिल्ह्यातील गाडीवाट नावाचा छोटसं गाव आहे. गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे. याच शाळेत चक्क विद्यार्थ्यांचं मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे. विशेष म्हणजे हे मंत्रिमंडळ अगदी लोकशाही पद्धतीनं निवडण्यात आलंय. त्यासाठी शाळेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने मतदान केलं आणि त्यामधून काही सदस्यांची निवड करण्यात आली.
advertisement
शाळेतून एकूण तेरा सदस्य निवडून आलेले आहेत. निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्यातून एकाची मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. या मुख्यमंत्र्याच्या अंतर्गत शाळेतील सर्व कामे हे विद्यार्थी बघतात. शाळेच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, पर्यावरण मंत्री, आरोग्य मंत्री, परसबाग मंत्री, क्रीडामंत्री, शिक्षण मंत्री, असे सर्व मंत्री आहेत.
प्रत्येक मंत्री आपापलं काम करतात. जे मंत्री काम करतात त्याचा सर्व रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देतात. मुख्यमंत्री तो रिपोर्ट शाळेच्या मुख्यध्यापकांना देतात. अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांचे काम चालते. जसं शाळेचे मंत्रिमंडळ आहे त्याचप्रमाणे वर्गाचे देखील मंत्रिमंडळ आहे. वर्गाचे मंत्रिमंडळ हे सर्व वर्गात जे काम चालतं ते त्याचे अपडेट मंत्र्यांना आणि हे मंत्री मुख्यमंत्र्यांना देतात.
दरम्यान, आमच्या शाळेचं असं मंत्रिमंडळ आहे. त्यामध्ये आम्ही सर्व मुलं मंत्री म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो. आम्हाला यामुळे लोकशाही काय आहे? निवडणूक प्रक्रिया, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये कळालेली आहेत, असं विद्यार्थ्यांनी सांगितलं.





