पतीच्या देहापाशीच पत्नीनेही प्राण सोडले
पतीची प्राणज्योत मावळल्यानंतर काही तासांतच पत्नीनेही प्राण त्यागल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोड तालुक्यातील केन्हाळा येथे घडली. रावसाहेब अमृता पांढरे (वय 65) आणि रत्नकलाबाई रावसाहेब पांढरे (वय 60) असे या दिवंगत दाम्पत्याचे नाव आहे. केन्हाळा येथील रहिवासी असलेल्या रावसाहेब पांढरे यांना दम्याचा त्रास होता. त्यातूनच गुरुवारी (दि. 29) रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली.
advertisement
कुटुंबीय त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांचे पार्थिव घरी आणले.
पतीचे पार्थिव पाहताच पत्नी रत्नकलाबाई पांढरे यांना जबर धक्का बसला आणि त्या क्षणात जमिनीवर कोसळल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. पतीच्या निधनाचा अतीव मानसिक ताण घेतल्याने त्यांच्या मेंदूतील नस फाटून रक्तस्राव झाला होता. हे रक्त गोठल्याने त्या कोमात गेल्या.
पती-पत्नीच्या निधनाने परिसरात हळहळ
दरम्यान शुक्रवारी रावसाहेब पांढरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पतीच्या चितेची राख थंडही झाली नव्हती तोच शनिवारी सकाळी 10 वाजता रत्नकलाबाई पांढरे यांनीही अखेरचा श्वास घेतला. काही तासांच्या अंतराने पती-पत्नीचे आयुष्य संपल्याची वार्ता कळताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
शनिवारी दुपारी रत्नकलाबाई पांढरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी दाम्पत्यामागे एक मुलगा, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
