मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला वार केला आहे. अस्तित्वासाठी झगडणारे दोन पक्ष एकत्र आले असून त्यांच्या युतीने काहीच परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. उद्धव आणि राज यांनी विचारांना तिलांजली दिल्याने त्यांना तुष्टीकरणाचे राजकारण करावं लागत असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरे बंधूंवर त्यांनी जोरदार हल्ला केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अस्तित्वासाठी झगडणाऱ्या दोन पक्षांची आघाडी आहे. या युतीची हवा अशी केली गेली, जसे काय रशिया-युक्रेनची युती होत आहे. एका बाजूला पुतीन आलेत, दुसरीकडे झेलेन्सकी आले असे वातावरण तयार करण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, त्यांनी मुंबईकरांचा विश्वासघात यांनी केलाय. अमराठींवर सातत्याने हल्ले केले आहेत. ह्यांचा ट्रॅक रेकोर्ड भ्रष्टाचाराचा असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. निवडणुका आल्या की भावनिक बोलतात. आता भावनिक बोलून चालणार नाही. तुम्हाला विकासावर बोलावं लागणार असल्याचे आव्हान फडणवीस यांनी दिले. मुंबईसह राज्यात महायुतीने केलेली विकासकामे पाहून मुंबईकर आम्हाला मते देतील असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले की, ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी नाही. त्यांच्या दुराभिमानामुळेच मराठी माणसं दूर गेली आहेत. मुंबईकरांच्या विकासाबाबत बोलावं लागेल. त्यांना २५ वर्षांचा हिशोब द्यावा लागणार असल्याचे सीएम फडणवीसांनी म्हटले.
मतांसाठी भगवी शाल घेणारे नाहीत...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हा हिंदुत्ववादी जन्माला आणि हिंदुत्वादी म्हणून मरणार. मतांसाठी भगवी शाल घेणारे आम्ही नाही. त्यांनी विचार सोडले म्हणून त्यांच्यावर अशी वेळ आली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
