नेमका वाद काय?
मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक अभियंता आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासक काळातील या बदल्यांबाबत तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली होती. मुख्यमंत्र्यांचा हा स्थगिती आदेश अद्याप कायम आहे.
महापौरांच्या पत्राने खळबळ
मुख्यमंत्र्यांचे स्थगिती आदेश असतानाही महापौर रितू तावडे यांनी अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना एक पत्र पाठवले आहे. 'म्युनिसिपल इंजिनिअर युनियन'कडून आलेल्या निवेदनाचा संदर्भ देत, महापौरांनी बदली आदेशांच्या अंमलबजावणीबाबत नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा स्थगिती आदेश धाब्यावर बसवून महापौरांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आता पालिका वर्तुळात रंगली आहे.
advertisement
मुंबई भाजपमध्ये दुफळीची शक्यता
या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची चर्चा आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनीच या बदल्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती, त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. आता भाजपच्याच महापौर रितू तावडे यांनी बदल्यांच्या बाजूने भूमिका घेतल्याने मुंबई भाजपमध्ये दोन गट पडले आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
