या उपक्रमामध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींची निर्मिती केली जाते. मूर्तींना केवळ नैसर्गिक रंग वापरून सजवलं जाते. मूर्तींना रंगवण्यासाठी हळद, कुंकू, बुक्का अशा पारंपरिक घटकांचा वापर केला जातो. या मूर्तींच्या निर्मितीसाठी कारखान्यातील कोणत्याही रसायनांचा किंवा कृत्रिम घटकांचा वापर केला जात नाही. हे गणपती पूर्णपणे नैसर्गिक, शुद्ध आणि इको-फ्रेंडली असतात, जे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात. दरवर्षी सुमारे 3000 पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या जातात. बाप्पाचं पारंपरिक सौंदर्य आणि संस्कृती लक्षात ठेवूनच मूर्ती घडवल्या जातात.
advertisement
Bhide Bridge Pune: पुणेकरांसाठी मोठा दिलासा, गणेशोत्सवाच्या आधी भिडे पूल वाहतुकीस खुला
या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे, भाविकांना मूर्तींची किंमत मनाप्रमाणे ठरवता येते. आपल्या मनातील रक्कम एका बंद पाकिटात ठेवून गुप्त दान स्वरूपात पैसे देता येतात. या उपक्रमातून जमा झालेले पैसे 'स्नेहसावली आपले घर' या वृद्धाश्रमासाठी वापरले जातात. श्री शंकर महाराज सेवा मंडळाचे पदाधिकारी डॉ. अविनाश वैद्य म्हणाले, "प्रत्येकावर समाजाचं काहीतरी ऋण असतं. हेच ऋण फेडण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला. वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठांच्या सेवेसाठी निधीची आवश्यकता असते. त्याचबरोबर, पर्यावरण संरक्षणाचा संदेशही द्यायचा होता. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींची निर्मिती सुरू केली."
या संकल्पनेला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. कारण, ही फक्त मूर्ती विक्री नसून श्रद्धा आणि सेवाभावाचा संगम आहे. भाविक आपल्या मनातील किंमत देतात. अनेकजण अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम देऊन वृद्धाश्रमाला हातभार लावतात.





