हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला
आत्महत्या करणाऱ्या उमेश ढेपे यांची अणदूर शिवारात शेती होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आर्थिक चिंतेत होते. या नैराश्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे. भावाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत त्याला एका खासगी व्यक्तीचं कर्ज सोडवायचं होतं. विहिरीसाठी आणि पाईप लाईनसाठी मयत शेतकऱ्याने कर्ज घेतलं होतं.
advertisement
घटनास्थळी पोहोचून पंचनामा
ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. नळदुर्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबाला आर्थिक मदत करावी
उमेश ढेपे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या मुला-बाळांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत असून, शासनाने तातडीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बळीराजाचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.