धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत लोकसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन मागविले आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील त्यामुळे या स्तिथीची पुर्वकल्पना देत काय उपाययोजना कराव्यात याबाबत जिल्हाधिकारी यांनी पत्र लिहले आहे.
advertisement
अनेक मराठा तरुणांनी लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचे संकेत दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना पत्र लिहले आहे. मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निदर्शनास आणून देत मार्गदर्शन मागविले आहे. मराठा समाजाने उमेदवार उभे केल्यास मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करावा लागेल, अधिकारी, वाहन, अपुरे मनुष्यबळ आदी अडचणी येणार आहेत. उमेदवार वाढल्यास मतपत्रिका तितक्याच मोठ्या आकाराची होणार, घडी घातल्यास मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार असून या बाबीवर जिल्हाधिकारी यांनी पत्रात मार्गदर्शक सूचना मागवल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र जरी लिहिले असले तरी जिल्हाधिकारी मात्र माध्यमातून प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.
...तर मतपत्रिकेवर निवडणूक
एक हजार मराठा समाजातील तरुणांची उमेदवारी अर्ज भरण्याचा इशारा दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात 736 गावे असुन बार्शी व औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर / मतपत्रिकावर निवडणुक घ्यावी लागते. एका मतदार संघात जास्तीत जास्त 24 मशीन उपलब्ध होऊ शकतात. त्यात एका मशीनमध्ये 16 उमेदवार असे 384 उमेदवार ईव्हीएमवर निवडणुक घेता येतात. त्यानंतर अधिक उमेदवार झाल्यास मतपत्रिकेवर निवडणुक घ्यावी लागते.
जरांगेंच्या आवाहनामुळे सरकारसह निवडणूक आयोगाची कोंडी
राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण देत मनोज जरांगे व मराठा समाजाची स्वतंत्र ओबीसी मधून आरक्षणाची मागणी जवळपास फेटाळली आहे. मात्र आता याच मागणीला घेऊन गनिमी कावा करत राज्य सरकार केंद्र सरकार व निवडणूक आयोग यांची कोंडी करण्यासाठी मराठा समाजाने लोकसभा उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. जरांगेंच्या या निर्णयामुळे प्रशासन सतर्क होऊन बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची चाचणी करत जरी असलं तरी खरंच ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर निवडणुका होणार की मराठा समाजाचा प्रश्न लोकसभा आचारसंहितापूर्वीच सोडवला जाणार हे बघावं लागेल.