काय म्हणाले राज ठाकरे?
आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटून चर्चा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मराठा आरक्षण मिळणे शक्य नाही. त्यासाठी घटनेत बदल करणे आवश्यक आहे. यामध्ये तुमची फक्त माथी भडकवण्याचं काम सध्या सुरू आहे. शरद पवार यांना हे सगळं माहित आहे. मग शरद पवार केंद्राकडे का बोलत नाही? छगन भुजबळ यांनी मराठा समाजावर बोलायचं आणि बाकी मराठ्यांनी ओबीसीवर बोलायचं एवढं सुरू आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मी अगोदर मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलतो. त्यानंतर चर्चा करून कळवतो. ज्या गोष्टी होतील, त्याला माझा पाठिंबा आहे, ज्या होणार नाही त्याला विरोध असेल, असं स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
advertisement
धाराशिवमध्ये काय घडलं?
मनसे प्रमुख राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल परिसरात मराठा कार्यकर्ते घुसले असून गोंधळ घालत घोषणाबाजी करत आहे. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी मराठा कार्यकर्त्यांनी केली. यासाठी कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्येच ठिय्या मांडला होता. सोलापूरमध्ये आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
वाचा - विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची आघाडी, पहिल्या दोन उमेदवारांची घोषणा
आरक्षणावर राज ठाकरे काय बोलले होते?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आज सकाळी ते सोलापुरात होते. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. या प्रश्नावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राममध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.