महानगरपालिकेच्या अनेक दिवसापासून रखडलेल्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. नवी मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली नाही. या ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. प्रचारादरम्यान शिंदेनी नाईकांचा टांगा पलटी, घोडे फरार करण्याची भाषा केली होती. नवी मुंबईमध्ये नाईकांना आपला दबदबा कायम ठेवला. आता ठाणे आणि कल्याणवरून नाईकांनी शिंदेंवर आरोप केले आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या घोड्यांचे लगाम ओढले गेले, अशी टीका नाईकांनी केली आहे. महायुतीत सत्तेत एकत्र असले तरी, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये अजिबात जमत नाही. वाद एवढा टोकाला गेलाय की नामोनिशाण मिटवण्यापर्यंत हे प्रकरण पोहचलं.
advertisement
गणेश नाईक युती धर्म विसरले: नरेश म्हस्के
त्यानंतर आता नरेश म्हस्के यांनी ट्वीट करत समाचार घेतला आहे. शिवसेनेला संपवायची परवानगी द्याच गणेश नाईकांना, आम्ही देखील तयार आहोत. वारंवार गणेश नाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असून ते युती धर्म विसरले आहेत.
नरेश म्हस्केंचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा..
मी तमाम शिवसैनिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की त्यांच्या ह्या त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमची तयारी आहे. खरे म्हणजे, महाराष्ट्रात महाबिघाडीची सत्ता उलथवून टाकण्यात भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय शिंदे साहेब या दोघांची मोठी भूमिका राहिली आहे. त्यानंतरच युतीचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकले आणि आज कल्याण डोंबिवली, ठाणे, मुंबई या ठिकाणी युती म्हणून लढत देऊन महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकात आपण मोठे यश मिळवले आहे.
या सर्व निर्णयांमध्ये आपली ही सक्रिय भूमिका राहिली आहे. सगळीकडे युती असताना युतीतल्या मोठ्या घटक पक्षाबद्दल असे विधान वारंवार करणे म्हणजे आपल्या पक्ष नेतृत्वावरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो परंतु, त्यासाठी पक्ष, पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक साहेब आमचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करीत आहेत. मोदीजींच्या आणि अमितभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब दिवस रात्र काम करीत आहेत.
काही बाबतीत विचार वेगळे असले तरी एक हिंदुत्ववादी, राष्ट्रीय विचारांचे स्थिर सरकार आपण त्यामुळेच देऊ शकलो आहोत. परंतु, त्यांना हे बघवत नसल्यानेच कदाचित ते अशी मागणी करत असावेत. धर्मवीर आनंद दिघेअसताना गणेश नाईक साहेबांना शिवसेनेने कशी धोबीपछाड दिली होती ते त्यांनी एकदा आठवावे. किंबहुना आपण त्यांना त्याचे स्मरण करून द्यावे. बाकी, शिवसेना त्यांच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर द्यायला सज्ज आहे. आज नवी मुंबईत दहा जागाही शिवसेनेच्या निवडून येऊ शकत नाहीत अशा वल्गना करणाऱ्या गणेश नाईक साहेबांना आम्ही 42जागा निवडून आणून दाखवले आहे. कदाचित त्यामुळेच त्यांची अस्वस्थता वाढलेली असू शकते. दिवस रात्र लोकांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या शिंदे साहेबांवर त्यामुळेच त्यांचा राग असू शकतो. तेव्हा त्यांच्या सर्व वक्तव्यांचा सखोल विचार करून त्यावर चिंतन करून आपण त्यांना शिवसेना संपवण्याची जबाबदारी देऊन टाकावीत ही नम्र विनंती.
महाबिघाडीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनआणि अन्यही काही नेत्यांवर गंडांतर आणून त्यांच्यावर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेबांच्या उठावानंतर युतीचे सरकार आले आणि त्यामुळेच त्यांना चोख प्रत्युत्तर देता आले.दिल्लीत सत्ता स्थापन करतेवेळी जेव्हा शिवसेनेने घटक पक्षाची भूमिका सत्तेत स्वीकारली त्यावेळी आजही सरकारवर प्रश्नचिन्ह उभे राहिले तर शिवसेनेकडून त्याला धडाकेबाज उत्तर दिले जाते सरकारच्या बाजूने विरोधी पक्षाने केलेल्या विरोधाचा फडशा पाडला जातो.
दिल्लीत NDA घटक पक्ष म्हणून आणि महाराष्ट्रात युतीचे भागीदार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी सत्तेत मोठ्या निर्णयात मोठ्या प्रकल्पांमध्ये खारीचा वाटा तरी उचलला आहे असे तुम्हाला वाटते का हो? आपल्या पक्षात पक्षश्रेष्ठीचा भंग करणारे नेते पक्षाची रचना आणि अध्यक्षांचे निर्णय याला न जुमानता मनमानी करत आहेत असे तुम्हाला वाटते का हो? कधीकधी तर आम्हाला असे वाटते की शिंदे साहेबांपेक्षा गणेश नाईक साहेबांचा पक्ष नेतृत्वावरच अविश्वास आहे आणि त्यामुळेच ते असे बेताल वर्तन बेचुटपणे करू शकतात. त्यांच्या उचललेल्या प्रत्येक पावलाचा सखोल अभ्यास आणि चिंतन करून तुम्ही त्यांना पुढील जबाबदारी सोपवाल अशी अपेक्षा आहे. सदैव महायुतीचे हित जपणारा, पक्षादेश शिरसावंद्य मानून युती धर्मासाठी लढणारा एक सच्चा शिवसैनिक...
